“तुम्ही देशाला मूर्ख बनवताय का?” ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याच्या घटनेवर संजय राऊताचा संतप्त सवाल

मुंबई | आशिया चषक २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवत करंडकावर नाव कोरले. मात्र, या विजयानंतर वाद पेटला आहे. भारतीय संघाने सामन्यानंतर पाकिस्तान सरकारमधील मंत्री व एशियन क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. यावर शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत म्हणाले, की ही नौटंकी आहे. तुम्ही मैदानावर एकत्र खेळताय. ज्याला देशाचा विरोध आहे. लोकांनी किंवा राष्ट्रभक्तांनी कालचा सामना पाहिलेला नाही. काल पीव्हीआर आणि इतर अनेक ठिकाणी सामना दाखवण्याचा प्रयत्न झाला ते लोकांनी हाणून पाडला. आधीच्या मॅचमध्ये पाकिस्तानच्या संघाशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला… अरे त्या मैदानावर खेळलात ना?
हेही वाचा : राज्यात आजही अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा! मुंबईसह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज
काल तुम्ही जिंकलात असं मला कळलं… काल तुम्ही जिंकलात तेव्हा तेव्हा पाकिस्तानचे मंत्री आहेत मोहसीन नक्वी, जे एशियन क्रिकेट काउंसिलचे अध्यक्ष आहेत. काल तुम्ही त्यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला, अरे पण तुम्ही खेळलात… तुम्ही खेळलात आणि १५ दिवसांपूर्वी त्याच मोहसीन नक्वींबरोबर याच भारतीय संघाने फोटो काढले, हस्तांदोलन केलं, ड्रेसिंग रूममध्ये किंवा कुठल्या तरी एका कार्यक्रमात…मग तुम्ही देशाला मूर्ख बनवताय का? बाहेरचं मैदानावरचं एक रुप वेगळं आहे आणि आतलं रूप वेगळं आहे. तुम्ही कोणाला मूर्ख बनवत आहात? तुम्ही आपल्या पंतप्रधानांकडून प्रेरणा घेतली आहे का लोकांना मूर्ख बनवण्याची? असा संतप्त सवाल राऊतांनी विचारला.
तुम्ही का खेळलात हा आमचा मूळ प्रश्न आहे. तुम्ही खेळायाला नको होतं. आमच्या हुतात्म्याचा आणि मारले गेले त्यांचा हा अपमान आहे, असंही संजय राऊत म्हणाले.





