देशात पुन्हा लॉकडाऊन? केंद्र सरकारने अफवांवर दिले स्पष्टीकरण

नवी दिल्ली | मध्य-पूर्वेतील (Middle East) युद्धजन्य परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणानंतर देशात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरू लागल्या आहेत. मात्र, या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नसून पंतप्रधानांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लॉकडाऊनच्या अफवा पसरवू नका, असा स्पष्ट इशारा दिला आहे. देशात लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या पातळीवर विचाराधीन नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
हेही वाचा : ३९ आमदार भेटून गेले, मग माझंच नाव का? खरात प्रकरणावर केसरकरांची स्पष्ट भूमिका
मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी, नागरिकांना शांत आणि जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले. अशा परिस्थितीत जर कुणी अफवा पसरवून घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते बेजबाबदार आणि हानिकारक कृत्य आहे, असेही ते म्हणाले.
हरदीप सिंग पुरी पुढे म्हणाले, जागतिक परिस्थिती सध्या अनिश्चित असली तरी आम्ही ऊर्जा, पुरवठा साखळी आणि महत्त्वाच्या उत्पादनांशी निगडित परिस्थितीवर नजर ठेवून आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशात इंधन, ऊर्जा आणि इतर आवश्यक बाबींचा योग्य पुरवठा होईल, याची काळजी घेत आहे. कोणत्याही अडथळ्यांशिवाय ऊर्जा पुरवठा सुरू आहे. कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत.
भारताने यापूर्वीही जागतिक संकट काळात एकजुटीने उभे राहण्याची किमया करून दाखवली आहे. पुढेही अशी काही परिस्थिती उद्भवल्यास आपण त्याचा योग्यरित्या सामना करू, असेही ते म्हणाले.





