‘मृतांनाच आरोपी ठरवण्याचा प्रयत्न’; कल्याणीनगर अपघात प्रकरणी अनिल देशमुखांचा आरोप

पुणे | पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणी अद्यापही चौकशी सुरू असून अल्पवयीन मुलाचे आई वडील आणि आजोबा कोठडीत आहेत. मुलाच्या रक्तात अल्कोहोलचे प्रमाण आढळू नये म्हणून ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या मदतीने रक्ताच्या नमुन्यात फेरफार करण्यात आला होता. आता, यावरून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
अनिल देशमुख एक्स पोस्टमध्ये म्हणाले, पुणे हिट ॲन्ड रन प्रकरणामध्ये राजकीय दबावाखाली आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून आरोपी दारू न पिल्याचा अहवाल तयार करण्याचे प्रयत्न झाले,हे उघड झाले आहे. आता माजी गृहमंत्री म्हणुन माझी माहिती अशी आहे की, मृतकांच्या Viscera Report मध्ये Alcohol+ve यावे याकरिता पूर्णपणे तयारी झाली आहे. जेणेकरुन या प्रकरणामध्ये मृत झालेले मोटरसायकल वरील तरुण तरुणी हे दारु पिऊन होते आणि त्यांच्यामुळेच हा अपघात झाला, असे न्यायालयात सिद्ध करता येईल. जेणेकरून विशाल अग्रवालचा मुलगा लवकर सुटेल, अशा पध्दतीने प्रयत्न सध्या सरू आहेत.
हेही वाचा – मोठी बातमी : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार राज्यसभेच्या खासदार होणार?
तरुण तरुणीच्या विसेरा रिपोर्ट अल्कोहोल पॉझिटिव्ह यावा याकरता प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या रक्ताच्या नमुन्यात दारुचा अंश टाकण्यात आल्याची माझी खात्री आहे. विशाल अग्रवलाच्या मुलाचे ब्लड सॅम्पल बदलण्यात आले. त्यावेळी शासनाचा दबाव त्यावर कसा होता हे सर्वांना माहित आहे. तो प्रयत्न अयशस्वी झाल्याने विशाल अग्रवलाच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न राज्य शासन करत आहे, असा माझा खुला आरोप आहे. हा प्रयत्न यशस्वी झाला तर जो आरोपी आहे त्याला सोडलं जाईल आणि जे या अपघातात मृत झाले आहेत त्यांना आरोपी केलं जाईल, असंही अनिल देशमुख म्हणाले.





