सौर कृषी वाहिनी योजनेत १० हजार कोटींचा ‘महाघोटाळा’; दानवेंचा सरकारवर गंभीर आरोप

मुंबई | राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत तब्बल १० हजार कोटींचा महाघोटाळा झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. दानवे यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पोस्ट करत हा आरोप केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांकडून वसुली होणार का, असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे.
अंबादास दानवे यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, महाराष्ट्राची महालुट! मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत १०,००० कोटींचा ‘महा-घोटाळा’ झाला आहे. NOPL Green, NACOF, IIPL आणि ONIX सारख्या कंपन्यांनी चक्क ‘बनावट बँक गॅरंटी’ देऊन कंत्राटं लाटली? महावितरणचे अधिकारी आणि कंपन्यांचे संचालक (दिव्येश सावलिया, पी. सुरेश बाबू इ.) यांच्या संगनमताने शेतकऱ्यांच्या नशिबी अंधार टाकण्याचा हा प्रयत्न आहे का? EOW कडे ५ गुन्हे दाखल होणे ही नामुष्की आहे, असे आरोप दानवे यांनी केले आहेत.
हेही वाचा : शरद पवारांची प्रकृती पुन्हा खालावली; रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल
तसेच अंबादास दानवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोस्ट टॅग करत म्हटलं की, सखोल चौकशी होऊन वसुली होणार का? अधिकाऱ्यांना शासन कोण करणार? अपारंपरिक ऊर्जा खात्याचा कारभार पाहणारे मंत्री यांच्या यातील सहभागाची चौकशी ‘पारदर्शक कारभाराचे पुरस्कर्ते’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार का? असा सवाल अंबादास दानवे यांनी केला आहे.




