गुन्हेगारांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी नाही; अजित पवार नेमकं काय म्हणाले?

पुणे | राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पुणे शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गुन्हेगारांच्या कुटुंबातील चार सदस्यांना उमेदवारी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे या चारपैकी तीन महिला उमेदवार असून, त्यातील दोन महिला सध्या कारागृहात असतानाच निवडणूक लढविणार असल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
नाना पेठेतील आयुष कोमकर खून प्रकरणातील आरोपी आणि सध्या तुरुंगात असलेल्या सोनाली आंदेकर व लक्ष्मी आंदेकर, तसेच कुख्यात गुंड गजानन मारणे यांची पत्नी जयश्री मारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ‘एबी’ फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पक्षाला टीकेचा सामना करावा लागत आहे.
हेही वाचा : Big News : मोशी प्रभाग- 2 मधील तिढा अखेर सुटला; अशी होणार लढत!
या पार्श्वभूमीवर माध्यमांनी प्रश्न विचारल्यानंतर अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, तुम्ही आजपर्यंतच्या सर्व निवडणुका आठवा. आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया- सचिन खरात यांच्याबरोबर युती झालेली आहे. काही जागा आम्ही त्यांना सोडलेल्या आहेत. मी त्यासंदर्भात वेगळी पत्रकार परिषद घेणार आहे. आपल्या सगळ्यांना माझी कामाची पद्धत माहिती आहे. आम्ही ज्यांच्याबरोबर युती करतो, त्यांना काही जागा सोडल्यानंतर त्यांनी त्या जागा कुणाला द्याव्यात हा त्यांचा निर्णय आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्मचे वाटप, उमेदवार नाकारले जाणे असे, गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे डबल एबी फॉर्म, नाराजी अशी गोष्टी घडल्या, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
दरम्यान अजित पवारांनी गुन्हेगारांना त्यांच्या पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी सचिन खरात यांच्या आरपीआय पक्षाकडे त्यांनी बोट दाखवले. याबद्दल सचिन खरात यांना प्रश्न विचारला असता, अजित पवारांशी चर्चा केल्यानंतर यावर सविस्तर बोलेन अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.





