पिंपरी-चिंचवडची तहान भागवणाऱ्या पवना धरणात ४७ टक्के पाणीसाठा शिल्लक
पिंपरी |
पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणामध्ये आज अखेर ३.९९ टीएमसी (४७ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. हे पाणी पुढील साडेचार महिने पुरेल असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाच टक्के पाणीसाठा कमी आहे. मावळसह पिंपरी चिंचवड शहराचा मुख्य पाण्याचा स्त्रोत म्हणून पवना धरणाकडे पाहिले जाते. धरणाची पाणी साठवण क्षमता ८.५१ टीएमसी आहे. पवना धरणाची पाणीपातळी ४९९५.८० दसलक्ष घनफूट आहे. सद्यस्थितीत धरणामध्ये ४७ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. मागील वर्षी आज अखेर धरणामध्ये ५२ टक्के पाणीसाठी शिल्लक होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पवना धरणात पाच टक्यांनी पाणीसाठा कमी आहे.
एप्रिल महिना सुरू झाला असून शहरामध्ये उन्हाचे तीव्र चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळे पाण्याचा वापर वाढला असून सद्यस्थितीत नागिरकांना पाण्याची टंचाई जाणवत आहे. शहरासाठी पवना धरणातून ४८० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील बंधाऱ्यातून ते पाणी उचलून शुद्ध करून शहराला पुरवले जाते. तर एमआयडीसीकडून ३० एमएलडी शुद्ध पाणी घेतले जाते. असे दररोज ५१० एमएलडी पाणी शहराला पुरवले जाते. शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तार पाहता शहरासाठी आंद्रा व भामा आसखेड येथून पाणीपुरवठा करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मात्र या प्रकल्पांचे काम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना सद्यस्थितीत मिळणाऱ्या ५१० एमएलडी पाण्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे.