चाकणच्या वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार
तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

महामार्गामुळे मावळ, खेड, शिरूर तालुक्याची वाहतूक कोंडी फुटणार
पिंपरी चिंचवड : मावळ, खेड आणि शिरूर तालुक्याच्या वाहतूक कोंडी पासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तळेगाव, चाकण, शिक्रापूर या महामार्गाच्या कामासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या मार्गावरील अतिक्रमणे नुकतीच काढण्यात आली असून महामार्गाच्या रुंदीकरणाला सध्या कोणताही अडथळा राहिलेला नाही. त्यातच मंत्रिमंडळाच्या बैठकीत महामार्गाच्या कामासाठी मंजुरी मिळाल्यामुळे चाकण मध्ये होणारी वाहतूक कोंडी फुटणार आहे.
तळेगाव-चाकण-शिक्रापूर या ५३ किमी राज्यमार्गावर तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग व समांतर चार पदरी रस्ता करणे, तसेच चाकण ते शिक्रापूर मार्गावर सहा पदरी रस्ता विकसित करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यासाठीच्या ४ हजार २०६ कोटी ८८ लाख रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
हेही वाचा – कडाक्याच्या उन्हाने पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट
तळेगाव चाकण शिक्रापूर हा रस्ता मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील तळेगाव या ठिकाणाहून सुरु होऊन चाकण व पुढे शिक्रापूरया ठिकाणी पुणे-अहिल्यानगर महामार्गास जोडला जातो.
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग ४८ आणि पुणे-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ या दोन महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा हा रस्ता पुणे शहराकरीता बाह्यवळण म्हणून उपयोगी पडणार आहे. या मार्गामुळे अनेक ठिकाणी होत असलेली वाहतूक कोंडी दूरहोणार आहे. तसेच परिसरातील औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.
रस्ते विकासात आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपुलासह बांधकाम केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाच्या माध्यमातून काम बीओटी तत्त्वावर हे काम केले जाणार आहे
तीन तालुक्यांना दिलासा
√मावळ, खेड, शिरूर तालुक्यांना दिलासा
√वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होईल
√उद्योग आणि गुंतवणूक वाढीस लागेल
√स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील
√प्रवास अधिक सुरक्षित व जलद होईल