आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेत ‘उद्याच्या भारताच्या शिक्षणव्यवस्थे’वर मंथन
डॉ. गिरीश देसाई यांचे प्रेरणादायी विचार; शिक्षणात लवचिकता, सुसंगतता व जागतिक पोहोच यावर भर

पिंपरी | २१व्या आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषद व संस्थात्मक उत्कृष्टता व नेतृत्व पुरस्कार २०२५ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण मिळाल्याबद्दल डॉ. गिरीश देसाई यांनी गौरव व्यक्त केला. ही परिषद Ramachandran International Institute of Management (RIIM पुणे) यांच्या वतीने, Brain World व Pune Management Association याच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती.
परिषदेतील “उद्यासाठी रूपांतरित भारताचे शिक्षण : लवचिकता, सुसंगतता व विस्तार” या विषयावर बोलताना डॉ. देसाई म्हणाले की, बदलत्या काळात शिक्षणव्यवस्था तंत्रज्ञानस्नेही, उद्योगाभिमुख आणि समाजाभिमुख असणे अत्यावश्यक आहे. शिक्षणातील नवोपक्रम, कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम आणि जागतिक दृष्टीकोन यामुळे भारताची शिक्षणव्यवस्था अधिक सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या वेळी RIIM चे अध्यक्ष सुरज शर्मा, कॅम्पस संचालक डॉ. अजित साने, पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप तुपे तसेच Brain World Groupच्या व्यवस्थापकीय संचालिका रेशू अग्रवाल यांच्या नेतृत्वाबद्दल डॉ. देसाई यांनी विशेष आभार मानले. अशा परिषदांमुळे शैक्षणिक उत्कृष्टतेचा गौरव होतो आणि परिवर्तनशील नेतृत्व घडण्यास चालना मिळते, असे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा : विद्यार्थ्यांनी अनुभवले गणिताची सृजनशीलता!

डॉ. गिरीश देसाई सध्या Pimpri Chinchwad Education Trust, Pimpri Chinchwad University व NMVPM येथे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असून, शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव तसेच Fidel Soft Tech Ltd येथे स्वतंत्र संचालक म्हणूनही ते जबाबदारी सांभाळत आहेत.
शिक्षण क्षेत्रातील शाश्वत परिवर्तनासाठी अशा आंतरराष्ट्रीय परिषदा महत्त्वपूर्ण ठरत असून, भविष्यातील भारत घडविण्यासाठी त्या दिशादर्शक ठरत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.





