संकल्प “पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा” ; आळंदी नगरपरिषदेमार्फत दीड दिवसांच्या 150 गणेश मूर्तींचे संकलन

पिंपरी : आळंदी नगरपरिषदेने समस्त आळंदी पंचक्रोशीत यंदाचा गणेश उत्सव हा पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून “माझी वसुंधरा अभियान 4.0” अभियाना अंतर्गत जल स्त्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी शहरात एकूण 5 मूर्ती संकलन केंद्रांचे नियोजन करण्यात आले असून सर्व नागरिकांनी गणेश मुर्त्यांचे विसर्जन नदी पात्रात न करता नगरपरिषदेच्या मूर्ती संकलन केंद्रावर मूर्ती दान करावे या नगरपरिषदेच्या आवाहनास नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दिड दिवसांच्या साधारण 150 गणेश मूर्तींचे संकलन झाले असून विधिवत पूजा करून त्या सर्व मूर्त्या पुनर्वापरा करिता सामाजिक संस्थेस सुपूर्त करण्यात आल्याची माहिती आळंदी नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.
गणेशोत्सव कालावधीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, विषारी रंग, प्लास्टिक आणि थर्मोकोलची सजावट इत्यादी गोष्टींचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो, जे पाण्यात न विरघळणारे व विषारी पदार्थ आहेत. या मुर्त्यांचे नद्या, तलाव, विहिरी यांमध्ये विसर्जन केल्यानंतर पाण्यात न विरघळल्याने जलप्रदूषण होऊन पाण्यातील अनेक जीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो. त्यामुळे आळंदी नगरपरिषद मागील काही वर्षांपासून “मूर्ती दान” ही संकल्पना अत्यंत प्रभावीपणे राबवित असून यास समस्त आळंदीकरांचा मोठा पाठिंबा मिळतो आहे.
हेही वाचा – ‘ही निवडणूक बारामतीकरांच्या भवितव्याची’; उपमुख्यमंत्री अजित पवार
नगरपरिषदेमार्फत तयार केलेल्या मूर्ती संकलन केंद्रावर विधिवत आरती करून गणेश मुर्त्यां व्यवस्थित रित्या जमा केल्या जातात व या मुर्त्या पुढे पुनर्वापरासाठी सेवा भावी संस्थांना दिल्या जातात.या संस्थान मार्फत सर्व गणेश मुर्त्याचे पावित्र्य जपत त्यांचा पुनर्वापर केला जातो .त्यामुळे जलस्त्रोतांचे प्रदूषण रोखले जावून पर्यावरण संवर्धनास हातभार लागतो. आळंदी नगरपरिषद मार्फत गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे आळंदी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले आहेत. संपूर्ण गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासक तथा मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सचिन गायकवाड यांची गणेशोत्सव नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून नगरपरिषदेच्या 12 अधिकारी व 70 कर्मचाऱ्यांवर विविध जबाबदाऱ्या दिल्या आहेत.
दि.7 रोजी श्री गणरायाचे मोठ्या जल्लोषात सर्वत्र आगमन झाले. प्रथा परंपरेनुसार काहींच्या घरांमध्ये गणपती बाप्पा दिड दिवस विराजमान होतात. काही गणेश भक्तांनी शनिवारी थाटामाटात आलेल्या दिड दिवसांच्या बाप्पाला जड अंतकरणाने काल (दि.8) निरोप दिला.





