पिंपरी-चिंचवड रेल्वे स्थानकाजवळील महापालिकेचे गाळे वर्षभरापासून रिकामेच
छोट्या व्यवसायिकांना संधी मिळावी, बचत गट, विधवा महिलांना प्राधान्य देण्याची मागणी
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने आकुर्डी रेल्वे स्थानकासमोरील भरका देवी आईस्क्रीम समोरील परिसरात सुमारे १५ बाय १५ आकाराचे ४९ व्यापारी गाळे उभारले आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत लाखो रुपये खर्चून हे बांधकाम पूर्ण होऊन एक वर्षाचा कालावधी उलटल्यानंतरही हे गाळे अजूनही वापरात आलेले नाहीत.
महापालिकेने या गाळ्यांसाठी वार्षिक भाड्याची दररोज लाखोंच्या घरात आकारणी केली आहे, ज्यामुळे छोटे व्यावसायिक, महिला बचत गट, अंध-अपंग बांधव यांच्यासाठी ते गाळे परवडणारे राहिलेले नाहीत. परिणामी, ही दुकाने गेल्या अनेक महिन्यांपासून रिकामी पडून असून, एकूणच योजनेच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हेही वाचा : ‘जीएसटी’ फसवणूक रॅकेटमधील ‘रेहमानी’वर कारवाईचा दणका!
या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, शहरातील प्रभावशाली राजकीय नेते आणि त्यांच्या बगलबच्च्यांना महापालिकेच्या उच्च किंमतीच्या भूखंडांवर विनामूल्य जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचवेळी सामान्य नागरिकांसाठी मात्र भाडेपट्टीच्या नावाखाली अडथळे निर्माण केले जात आहेत.
काळभोर यांनी स्पष्टपणे सांगितले की, शहरातील बचत गट, विधवा महिला, दिव्यांग नागरिक, माजी सैनिक यांना या गाळ्यांमध्ये प्राधान्याने विनामूल्य किंवा अत्यल्प दराने जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. अशा लोकांना व्यवसायाची संधी देऊन त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला हातभार लावणे, हेच खरे सामाजिक उत्तरदायित्व ठरेल.
तसेच, भूमी अभिलेख विभाग आणि संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांची चौकशी करून, गैरकारभार झाला असल्यास दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशीही ठाम मागणी करण्यात आली आहे.
महापालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून उभारलेले हे दुकाने जर वर्षभर रिकामे राहणार असतील, तर जनतेच्या कररूपाने जमा होणाऱ्या निधीचा अपव्यय झाल्याचेच चित्र दिसते. त्यामुळे हे गाळे तातडीने सुरू करून सामाजिक दृष्टिकोनातून गरजू घटकांना प्राधान्याने देण्यात यावेत, अशी मागणी सध्या जोर धरत आहे.





