Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य’; मंत्री संजय शिरसाट

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशाच्या प्रगतीचे शिल्पकार आहेत. शिक्षण, समानता आणि सामाजिक न्याय यांचे महत्त्व त्यांनी समाजाला पटवून दिले, त्यांच्या विचारांचा प्रभाव प्रत्येकाच्या जीवनात जाणवतो. समाजातील पुढील पिढ्यांपर्यंत बाबासाहेबांचा विचार पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यांनी दिलेल्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य असल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती उत्सवानिमित्त शिवाजी पार्क दादर येथे प्रथमच ड्रोन शो व सांस्कृतिक कार्यक्रम  पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार सर्वश्री अमित साटम, योगेश सागर, प्रसाद लाड, कॅप्टन आर. तमिळ सेल्वन, महापौर रितू तावडे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे,  सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर,भन्ते डॉ.राहुल बोधी महाथेरो व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

मंत्री शिरसाट यांनी, डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भरविण्यात येणाऱ्या पुस्तक प्रदर्शनांचा विशेष उल्लेख करत, बाबासाहेबांचे विचार समजून घेणे आणि आत्मसात करण्यासाठी वाचनाची सवय जोपासावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. डॉ. आंबेडकर यांच्या जयंती आणि महापरिनिर्वाण दिनी लाखो अनुयायी एकत्र येऊन अभिवादन करतात, ही त्यांच्या कार्याची खरी पोचपावती असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  ‘सिंधी समाजाचे सर्वच क्षेत्रात मोलाचे योगदान’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दया, क्षमा आणि शांतीचे मूल्य दिले. समानता, समान संधी आणि सामाजिक जबाबदारी यांवर आधारित त्यांचा विचार आजही मार्गदर्शक ठरत आहे. त्यांच्या विचारांवर चालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या यशाची गुरुकिल्ली त्यांच्या तत्त्वज्ञानातच दडलेली आहे. भारतीय संविधान हे जगासाठी मार्गदर्शक ठरणारे असून, त्यावर उभारलेली लोकशाही व्यवस्था, प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय व्यवस्था ही समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचविण्याचे काम करत आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान व त्यांच्या विचारांमुळेच समाजातील सर्व घटकांना समान हक्क आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळाली आहे. ड्रोन शो या अभिनव उपक्रमांतून  नागरिकांना आकाशात त्यांच्या कार्याचे नेत्रदीपक दर्शन घडले. त्यांच्या विचारांचा जागर देशभरासह जागतिक स्तरावर होत असून, अशा अभिनव उपक्रमांतून नव्या पिढीपर्यंत त्यांचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या ड्रोन शोद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन करण्यात आले. सुमारे २००० ड्रोनच्या सहाय्याने आकाशात साकारण्यात आलेली प्रकाशचित्रे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. या प्रकाशचित्रांमध्ये डॉ. आंबेडकरांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण टप्पे प्रभावीपणे उलगडण्यात आले. तसेच भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित करणारी विलोभनीय दृश्ये साकारण्यात आली. महामानवाने घडविलेल्या सामाजिक क्रांतीचा प्रेरणादायी प्रवासही या ड्रोन शोमधून जिवंत करण्यात आला.

यावेळी गायिका वैशाली माडे यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button