महापालिका अभय योजनेला मुदतवाढ द्या; नगरसेवक उदय गायकवाड यांची मागणी
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणारी अभय योजना ही नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक ठरत असताना, या योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा यासाठी विद्यमान नगरसेवक उदय गायकवाड यांनी पुढाकार घेतला आहे.
त्यांनी नुकतेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी तसेच महापौर रवी लांडगे यांना याबाबत निवेदन देत, अभय योजनेच्या कालावधीत किमान एप्रिल २०२६ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नगरसेवक उदय गायकवाड यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, महानगरपालिकेच्या थकबाकी वसुलीसाठी राबविण्यात येणारी अभय योजना नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली आहे. या योजनेमुळे अनेक नागरिकांनी पुढे येत मिळकत कर भरण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, महानगरपालिकेच्या महसुलातही वाढ होत आहे.
हेही वाचा: नाशिकफाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदा प्रक्रियेला गती
मात्र, काही नागरिकांना योजनेची माहिती उशिरा मिळाल्याने, तसेच काहींना आर्थिक अडचणी किंवा अन्य कारणांमुळे ठरावीक कालावधीत या योजनेचा लाभ घेता आलेला नाही. त्यामुळे आजही मोठ्या संख्येने नागरिक अभय योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी आणि महानगरपालिकेच्या महसुलवाढीच्या दृष्टीने अभय योजनेला मुदतवाढ देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत, एप्रिल २०२६ अखेरपर्यंत ही योजना सुरू ठेवावी, अशी ठाम मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.
“पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची अभय योजना ही सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी योजना आहे. या योजनेमुळे अनेक नागरिकांनी थकबाकी कर भरण्यास पुढाकार घेतला असून, महापालिकेच्या महसुलातही सकारात्मक वाढ झाली आहे. नागरिकांच्या हिताचा विचार करून आणि महानगरपालिकेच्या आर्थिक बळकटीसाठी अभय योजनेस एप्रिल २०२६ अखेर मुदतवाढ मिळावी, यासाठी आम्ही आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करीत आहे.”
– उदय गायकवाड, नगरसेवक, पिं. चिं. मनपा.





