लोकभावनाच महाराजांच्या विजयाची शाश्वती! संभाजीराजे छत्रपती यांचा विश्वास
लोकसभा निवडणूक रणसंग्राम : वडिलांना जिंकून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार : संभाजीराजे
कोल्हापूर: महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदार संघात शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी जाहीर होताच संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या वडिलांना जिंकून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. लोकसभावनाच महाराजांच्या विजयाची शाश्वती आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एक्सवर याबाबत त्यांनी पोस्ट शेअर करत महाराजांच्या विजयाची खात्री असल्याचे म्हटले आहे.
एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे की,
अभिनंदन बाबा…
गेले तीन दिवस श्री शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारार्थ मी राधानगरी तालुक्याच्या दौऱ्यावर होतो. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेल्या व निबीड अरण्यात वसलेल्या “वाकीघोल” या अत्यंत दुर्गम भागात माझा दौरा होता. परवा रात्री मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मोबाईलला थोडी रेंज आली आणि शाहू छत्रपती महाराजांना उमेदवारी जाहीर झाल्याची बातमी दिसली. मन आनंदून गेले. लागलीच कोल्हापूरला जाऊन महाराजांना भेटण्याची इच्छा झाली. पण लगेचच जबाबदारीचीही जाणीव झाली. हातातले काम… पुढे दिलेला शब्द…. आणि पुढचा नियोजित दौरा पूर्ण करूनच कोल्हापूरला निघायचे ठरवले. आज दौरा संपवून घरी आल्यानंतर लगेचच महाराजांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
खरेतर तिकीटासाठी एकदाही मुंबई दिल्लीला न जाता, कुठल्याही नेत्याकडे तिकीटाची मागणी न करता, केवळ लोकभावना पाहून तीन पक्षांनी एकत्र येत महाराजांना लोकसभा लढण्याची विनंती केली. महाराजांनी आयुष्यभर राजकारणापासून व प्रसिद्धी पासून अलिप्त राहत जे जनसेवेचे कार्य केले आहे, राजघराण्याची झूल न पांघरता लोकशाहीचा पुरस्कार करण्याची जी भूमिका आयुष्यभर जपली आहे, त्याचेच हे प्रमाण आहे.