धक्कादायक! बागेश्वर धाममधून लोक होतायत बेपत्ता, ४ महिन्यांत २१ लोक बेपत्ता
Bageshwar Dham : गेल्या काही दिवसांपासून बागेश्वर धाम आणि पंडित धीरेंद्र शास्त्री चर्चेत आहेत. त्यांच्या दरबारात अनेकजण आपल्या समस्या घेऊन जातात आणि बाबा त्या समस्या सोडवण्याचा दावा करतात. दरम्यान, बागेश्वर धाममधून ४ महिन्यात २१ लोक बेपत्ता झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बागेश्वर धाम येथून बेपत्ता झालेल्यांपैकी अनेक जण मानसिक आजारी आणि गर्दीमुळे कुटुंबापासून विभक्त झालेले अनेकजण आहेत. आपल्या विभक्त झालेल्या आणि हरवलेल्या लोकांच्या शोधात देशाच्या इतर राज्यात राहणारे अनेक लोक धामच्या पोलीस स्टेशन आणि कार्यालयांच्या चकरा मारत आहेत.
हेही वाचा – सावधान! देशात उन्हाचा चटका वाढणार; हवामान विभागाचा अंदाज
पोलीस दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२३ पासून बागेश्वर धाम येथून २१ जण बेपत्ता झाले आहेत. यातील 9 जणांचा शोध लागला असला तरी १२ जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती आहे. सध्या पोलिस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत.
छतरपूर जिल्ह्याचे पोलिस कॅप्टन अमित सांघी यांनी सांगितले की, पोलिस इतर १२ बेपत्ता लोकांपर्यंत पोहोचण्याचा सतत प्रयत्न करत आहेत. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू आहे.