‘..तसं इंडियाचं नाव भारत होऊ शकतं’; इंडिया-भारत वादावर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया
पुणे : इंडिया नाव न वापरता भारत हेच नाव वापरण्याचं धोरण केंद्र सरकारने राबवल्याचं दिसून येत आहे. यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये अनेक आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. दरम्यान, यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या त्यांचा राज्यभर शिवशक्ती परिक्रमा यात्रेचा दौरा सुरू आहे. त्या आज पुण्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या, तुम्ही इंडियामध्ये राहतात की भारतात? आपलं नाव भारत आहे आणि इंडिया आहे. बॉम्बेचं जसं मुंबई होऊ शकतं, तर इंडिया भारती ही एक चर्चा असून त्यावर काही तरी निर्णय होईल. आपण दोन्हीमध्ये राहत नसून त्या काळात कॉलनियन लोकांनी हे नाव दिलं आहे.
हेही वाचा – World Cup 2023 : वर्ल्डकप सामन्यांच्या तिकीटांच्या किंमती गगनाला भिडल्या!
दिल्लीमध्ये जी-२० समूहाच्या राष्ट्रप्रमुखांच्या शिखर बैठकीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरकारी रात्रभोजनाचे आयोजन केलं आहे. त्यासाठी राष्ट्रपती भवनातून पाठवलेल्या निमंत्रणपत्रिकेवर ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला आहे. या बदलामुळे राजकीय वाद पेटला आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही ‘प्राईम मिनिस्टर ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ASEAN-India परिषदेसाठी आज इंडोनेशियाला जाणार आहेत. पंतप्रधानांच्या इंडोनेशिया दौऱ्यावरील सरकारी पुस्तकेत नरेंद्र मोदींचा उल्लेख ‘प्राईम मिनिस्टर ऑफ भारत’ असा करण्यात आला आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.