मध्य रेल्वेने निव्वळ भंगारातून मिळवला ५०५ कोटींहून ८५ लाख रुपये इतके महसूल
मुंबई | मध्य रेल्वेने ‘शून्य भंगार मोहीम’ हाती घेतली असून या मोहिमे अंतर्गत मध्य रेल्वेचे सगळे विभाग भंगार साहित्यापासून मुक्त करण्याचा रेल्वेप्रशासनाचा मानस आहे. या उपक्रमामुळे शेकडो कोटींचा महसूल देखील मध्य रेल्वेच्या तिजोरीत जमा झाला आहे. या मोहिमे अंतर्गत २०२१-२२ या आर्थिक वर्षात २३ मार्च २०२२ पर्यंत भंगारातून ५०५ कोटी ८५ लाख रुपये इतके महसूल रेल्वेने मिळवले आहेत.
या वर्षभरात ४०० कोटी रुपयांचे भंगार विक्रीचे लक्ष मध्य रेल्वेने ठेवले होते. पण सध्या मिळालेला महसूल ठरवलेल्या टार्गेटपेक्षा २६.४६ टक्के अधिक आहे. ‘शून्य भंगार मोहीम’ अंतर्गत या भंगार साहित्यात खराब झालेले रुळ, पर्मनंट-वे साहित्य, निरुपयोगी डबे, वॅगन आणि इंजीन इत्यादींचा समावेश आहे. मागच्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०२०-२१ या वर्षात ३५० कोटी रुपयांचा भंगार विक्रीचे लक्ष्य ठेवण्यात आले होते, पण त्याहून अधिक तब्बल ३९१ कोटी ४३ लाख रुपयांचे भंगार मध्य रेल्वेने विक्री केले होते.