भारत-पाकिस्तान संबंध आणखी चिघळणार? पाकिस्तानचा भारतावर गंभीर आरोप
IND vs PAK : प्रेषित मोहम्मद यांच्या जयंतीदिवशी पाकिस्तानमध्ये मदिना मशिदीजवळ ईदच्या मिरवणुकीत आत्मघातकी स्फोट झाला. या भीषण स्फोटात सुमारे ६० जणांचा मृत्यू झाला तर ६० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले. पोलिसांच्या वाहनांजवळच हा स्फोट घडला, यामध्ये मालमत्तेचंही प्रचंड नुकसान झालं. या स्फोटानंतर अवघ्या काही तासांत खैबर पख्तूनख्वाच्या हंगू शहरातील एका मशिदीत आणखी एक स्फोट झाला. यामध्ये किमान ५ लोकांचा मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी झाले.
दरम्यान, यानंतर पाकिस्तानने भारतावर गंभीर आरोप केले आहेत. पाकिस्तानचे गृहमंत्री सरफराज बुगती यांनी भारतावर गंभीर आरोप केला आहे. संबंधित आत्मघातकी स्फोटामागे भारतीय गुप्तचर संस्था RAW चा हात असल्याचा आरोप पाकिस्तानने केला.
हेही वाचा – Pune : PMPML बसमध्ये UPI पेमेंट सेवा उपलब्ध
मस्तुंग येथील आत्मघातकी बॉम्बस्फोटात सामील असलेल्या घटकांना पाकिस्तानी लष्कर आणि इतर सर्व संस्थांकडून जशास तसं उत्तर दिलं जाईल. या हल्लात RAW सामील आहे, असं गृहमंत्री सरफराज बुगती म्हणाले. दरम्यान, घटनेचा तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही, अशी माहिती सीटीडीने दिली.