मुंबईत फक्त एक दिवसाचा लसीचा साठा शिल्लक – महापौर
मुंबई – देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून राजकीय वाद सुरू झाला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आता मुंबईत फक्त एक दिवसाचा लसीचा साठा शिल्लक असल्याची माहिती दिली आहे. त्या मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. दरम्यान, लस नसल्याने बीकेसी, मुलुंडमध्ये लसीसकरण बंद करण्यात आले आहे.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ‘अनेक केंद्रांवर लसच उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. आपल्याकडे अत्यंत अल्प साठा आहे. १ लाख ७६ हजार लस येत असल्याचे मला माध्यमांकडून कळाले आहे पण तेदेखील अपुरे पडणार आहे. कारण दुसरा डोस घेणाऱ्यांचीच इतकी मोठी रांग आहे. बीकेसीमध्ये केंद्राबाहेर लोकांची मोठी रांग लागली आहे. रुग्ण वाढत असताना लस घेऊन सुरक्षित राहावे अशी लोकांची भावना आहे. गर्दीचे रुपांतर मोठे होत असून त्यात लस घेण्यासाठी आलेले कोणी बाधित तर होत नाही ना अशी भीती आहे.’
दरम्यान, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी याविषयी गंभीर आणि सक्रीय आहेत पण त्यांच्या हाताखाली काम करणारे लोक त्याच गांभीर्याने याकडे पाहत नसल्याचे दिसत आहे’, अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच राजकारण केले जाऊ नये असे आवाहन करताना त्याचा कंटाळा आला असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.
तसेच ‘आपल्याला लोकांना वाचवायचे आहे. मग ते देशातील, राज्यातील मुंबईतील कुठलेही असो, असे आवाहन करताना लोकसंख्येप्रमाणे लसींचे वाटप झाले पाहिजे अशी मागणी यावेळी त्यांनी केली. त्याचबरोबर ‘लसीचा साठा किती आहे याची माहिती केंद्राबाहेर बोर्डावर लावण्यात येणार आहे’, असे त्यांनी यावेळी सांगितले.