Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

नऊ टक्केच पाणीसाठा, तलाव गाठताहेत तळ; मुंबईकरांनो पाणी जपून वापरा

नऊ टक्केच पाणीसाठा शिल्लक; कपातीबाबत चर्चा, बैठक नाही

मुंबईः अद्याप दमदार पाऊस नसल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाण्याची स्थिती खालावत चालली आहे. बुधवारी तलावांमध्ये एक लाख ४३ हजार १४० दशलक्ष लिटर (९. ८९ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र पालिका प्रशासनाकडून पाणीकपातीबाबत अद्याप कोणतीही चर्चा किंवा बैठक झालेली नाही.

मुंबईला वर्षभर विनाकपात पाणीपुरवठा करण्यासाठी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची आवश्यकता असते. गेल्या दोन वर्षांतील २२ जूनच्या तुलनेत तलाव क्षेत्रात कमी पाऊस पडला आहे. पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत ८० हजार दशलक्ष लिटर तर २०२०च्या तुलनेत आठ हजार दशलक्ष लिटरहून कमी आहे. त्यामुळे मुंबईत १० ते १५ टक्के पाणी कपात होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. मात्र प्रशासकीय पातळीवर कमी पाऊस, तलावांतील घटत जाणारा साठा आणि कपातीबाबत फार गांभीर्याने घेतले जात नसल्याचे चित्र आहे.

पालिकेचे जलअभियंता संजय आर्ते यांच्याकडे कपातीबाबत काही बैठक किंवा निर्णय घेण्यात आला आहे का, याची विचारणा केली असता यापैकी असे काही झालेले नसल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा तलावात सध्या शून्य पाणीसाठा असून, तानसामध्ये जेमतेम दीड दिवस पुरेल इतकाच साठा आहे. विहार आणि तुळशी हे तुलनेने खूपच कमी साठवण क्षमता असलेले तलाव आहेत. त्यामुळे सध्या भातसा आणि मोडकसागर या तलावांवरच सर्व भिस्त आहे. मध्य वैतरणात चार ते पाच दिवस पुरेल इतके पाणी आहे.

जूनमधील वर्षनिहाय जलसाठा

२०२० : १,५१,१२५ दशलक्ष लिटर (१०.४४ टक्के)

२०२१ : २,१९२,७९ दशलक्ष लिटर (१५.१५ टक्के)

२०२२ : १,४३,१४० दशलक्ष लिटर (९.८९ टक्के)

तलाव आवश्यक साठा सध्याचा साठा (दशलक्ष लिटरमध्ये)

उच्च वैतरणा २,२७,०४७ ०

मोडकसागर १,२८,९२५ ४६,९४४

तानसा १,४५,०८० ५,५५१

मध्य वैतरणा १,९३,५३० १८,३५०

भातसा ७,१७,०३७ ६६,३४८

विहार २७,६९८ ३,८३२

तुळशी ८,०४६ २,११४

(माहिती स्रोत : मुंबई महापालिका)

अपव्‍यय टाळा, पाणी वाचवा…

– घरातील इतर कामे करत असताना नळ बंद ठेवा

– गळके नळ, जलवाहिन्‍या त्‍वरित दुरुस्‍त करून घ्‍या

– दाढी करताना, दात घासताना पाण्‍याचा नळ बंद ठेवा

– वाहत्‍या नळाखाली कपडे-भांडी धुऊ नका

– आंघोळ करताना शॉवर सतत सुरू ठेवू नका

– नळाखाली बादली भरत ठेवून पाणी वाहू देऊ नका

– आदल्‍या दिवशीचे पाणी शिळे समजून फेकू नका

– गॅलरी, व्‍हरांडा व लादी धुण्‍याऐवजी ओल्‍या फडक्‍याने पुसून घ्‍या

– भुजलाची पातळी सुधारण्‍यासाठी वृक्षारोपण करा

– झाडांसाठी गरजेपेक्षा जास्‍त पाण्‍याचा वापर करू नका

– वर्षा संचयन व विन‍ियोगाच्‍या पद्धतींचा वापर करा

– पाण्‍याच्‍या टाक्‍या वाहू देवू नका. त्‍यांना बॉलकॉक बसवा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button