धक्कादायक! पाळी आली का नाही तपासण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रशासनाने मुलींना अंतर्वस्त्रे काढण्यास केली बळजबरी…
गुजरातमधील भूज जिल्ह्यातील जवळपास ६० विद्यार्थिनींना पाळी आली का नाही हे तपासण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रशासनाने त्यांची अंतर्वस्त्रे काढण्यासाठी बळजबरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
भूजमधील श्री सहजानंद गर्ल्स इन्स्टिट्यूटमधील एका विद्यार्थिनीने ‘अहमदाबाद मिरर’ वृत्तपत्राशी बोलताना या भीषण प्रकाराबद्दल माहिती दिली. या विद्यार्थिनींना त्यांचे वर्ग सुरू असताना बाहेर बोलावण्यात आले आणि एका रांगेत उभे करण्यात आले. या विद्यार्थिनी ज्या वसतीगृहामध्ये राहतात त्याच्या रेक्टरनी या मुलींसंदर्भात महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे तक्रार केली होती. या विद्यार्थिनी मासिक पाळीच्या वेळी धार्मिक गोष्टींचे पालन करीत नाहीत, अशी त्यांची तक्रार होती.
माहिती देणारी विद्यार्थिनी म्हणाली, महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आम्हाला अपशब्द वापरले. कोणाला मासिक पाळी आली आहे का, असे आम्हाला विचारण्यात आले. आमच्यापैकी दोन विद्यार्थिनी पुढे गेल्या. त्यानंतर आम्हाला सगळ्यांना स्वच्छतागृहात नेण्यात आले. तिथे असलेल्या महिला शिक्षकांनी एका मागून एक विद्यार्थिनीला बोलावून घेत आमची अंतर्वस्त्रे काढण्यास सांगितले. आम्हाला मासिक पाळी आली आहे की नाही याची तपासणी करण्यात आली.
दरम्यान, महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे म्हटले आहे. विद्यार्थिनींना बळजबरीने अंतर्वस्त्रे काढण्यास सांगण्यात आली नाहीत, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थिनींची पूर्वपरवानगी घेऊनच सर्व काही करण्यात आले. कोणावरही बळजबरी करण्यात आली नाही. कोणीही विद्यार्थिनींना हात लावला नसल्याचं महाविद्यालयाच्या दर्शना ढोलकिया यांनी सांगितले.