शेतकऱ्यांनी जगायचे कसे? कांद्याला मिळाला सव्वा रुपये किलोचा भाव
खर्च वजा करता शेतकऱ्याच्या हातात आले 569 रुपये
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर गडगडल्याने शेतकरी हताश झाला आहे. आधीच अवकाळी पाऊस आणि कांद्याला मिळणारा कवडीमोल भाव यामुळे शेतकरी पुरता खचून गेला आहे. कांदा लागवडीपासून ते काढणीपर्यंत झालेला खर्चही निघत नाही. विधानसभा अर्थसंकल्पात विरोधी पक्षाने शेतकऱ्यांची बाजू मांडून थोडा धीर दिला आहे.
विरोधी पक्षाच्या मागणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांद्याला 350 रुपये अनुदान जाहीर केले आहे. मात्र अशातच कांद्याच्या दरात काही केल्या वाढ होताना दिसत नाही. कांदा उत्पादकांना कवडीमोल भाव मिळत आहे. नाशिक जिल्ह्याच्या सटाणा येथील ब्राम्हणगावातील शेतकरी सुभाष अहिरे यांना सटाणा बाजार समितीत कांद्याला किलोला सव्वा रुपये भाव मिळाला आहे. सर्व खर्च वजा करता अहिरे यांच्या हातात 569 रुपये आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी जगायचे कसे? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
तसेच राज्यातील बऱ्याच बाजार समित्यांमध्ये तर सगळा खर्च जाऊन काही शेतकऱ्यांच्या हातात अवघे 2 रुपये आले आहेत. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनाच आपल्या पदरचे पैसे घालावे लागले आहेत. त्यामुळे वाहन आणि इतर खर्चासाठी शेतकऱ्यावर आपल्याच खिशातून पैसे काढून देण्याची वेळ आली आहे.
बाजार समितीत शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. व्यापारी मागणी नसल्याचे सांगतात. मात्र किरकोळ बाजारात १० ते १५ रूपयांनी कांदा विक्री होत आहे. बरीच वाहने १०० ते २०० दरम्यान विकली गेली. घरातून पैसे देऊन व्यवहार पूर्ण करावा लागत आहे, असं शेतकरी सुभाष अहिरे म्हणाले.