बारावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी राज्यात 17 गैरप्रकार उघडकीस
बारावी बोर्ड परीक्षेत सर्वाधिक गैरप्रकारांची नोंद पुणे विभागात
पुणे : राज्यात बारावी बोर्ड परीक्षेच्या काल (21 फेब्रुवारी) पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरवेळी राज्य सरकारच्या ‘मिशन कॉपीमुक्ती’चाही फज्जा उडाला. इंग्रजीच्या पेपरवेळी सर्रास कॉपीचा पुरवठा सुरुच होता. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी 17 गैरप्रकार उघडकीस आले आहेत. यामध्ये सर्वाधिक गैरप्रकारांची नोंद पुणे विभागात झाली. राज्यात पुणे, नाशिक, औरंगाबाद, यवतमाळ, परभणी, अमरावती, वाशिम या ठिकाणी पेपर व्हायरल झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
मिळालेल्या माहीतीनुसार, जळगावमध्ये काल इंग्रजीचा पेपर सुरु झाल्यानंतर फक्त दहाच मिनिटात प्रश्नपत्रिकेची फोटोकॉपी बाहेर आली, त्याची उत्तरे तज्ञांकडून लिहून ती व्हायरल झाली. असंही सांगितलं जात आहे की, यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाला असल्याचं म्हटलं जातंय. काही कॉपीबहाद्दरांवर कारवाई देखील झाली आहे.
तसेच परभणीत इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करणाऱ्या परभणीतील सहा शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय यवतमाळमधील मुकुटबन येथील एका शाळेतून बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपर सुरु असताना अर्ध्या तासातच या प्रश्नपत्रिकेचे 4 पाने व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. तर वाशिममध्ये मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे 22 मिनिटांतच इंग्रजीच्या पेपरचे 12 ते 15 फोटो व्हायरल झाले.
दरम्यान, राज्य बोर्डाच्या सचिव अनुराधा ओक यांनी काल इंग्रजीच्या पेपरमध्ये झालेल्या चुकांबाबत सांगितलं की, “या त्रुटीबाबत सध्या शिक्षकांनी परीक्षेच्या कामावर बहिष्कार टाकलेला असल्यामुळे बैठक होऊ शकली नाही. मुख्य नियामकांची संयुक्त सभा लवकरच घेण्यात येईल आणि विद्यार्थ्यांना न्याय दिला जाईल”, असं त्या म्हणाल्या. दरम्यान काल बारावी बोर्डाच्या पहिल्याच पेपरमध्ये चूका निघाल्या. काही प्रश्नांऐवजी थेट उत्तरेच छापून आल्याने विद्यार्थ्यांना समजेनासे झाले होते. या चुकांमुळे बोर्डाला 3 प्रश्नांचे प्रत्येकी 2 गुण विद्यार्थ्यांना द्यावे लागू शकतात, अद्याप यावर शिक्षण मंडळाचा विचार होणे बाकी आहे.