संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीच्या वतीने भाविकांना गर्दी न करण्याचे आवाहन!
आळंदीः चीन, अमेरिका, जपानसह अनेक देशांमध्ये कोरोनाची नवी लाट आलेली आहे. या देशांमध्ये संसर्गाचा फैलाव झपाट्याने होत असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत. परिणामी या सर्व बाबींचा विचार करता या संसर्गाचा फैलाव रोखणे हे शासनाबरोबर आपल्या सर्व सुजाण नागरिक भाविकांचे कर्तव्य आहे. तीर्थक्षेत्र आळंदी येथे येणारे भाविक, वारकरी ग्रामस्थ व अन्य दर्शनार्थी तसेच व्यापक समाजहित विचारात घेऊन ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीच्या वतीने सर्व भाविक, भक्तांना आवाहन करण्यात आले आहे की, संत श्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर व परिसरामध्ये गर्दी करू नये.
वयोवृद्ध, लहान मुले, तसेच आजारी व्यक्ती, यांनी शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. तसेच मंदिर परिसरात सर्वांनी मास्कचा वापर करुन मंदिर परिसरात प्रवेश करावा, असे आवाहन ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगेश वसंतराव देसाई यांनी केले आहे.