आता मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपासही NIA करणार..
मुंबई – मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास आता NIAकडे सुपूर्द करण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून याबाबतचा अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
वाचा :-दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार : शिक्षणमंत्री
उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्चला सापडला होता. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे गूढ अद्यापही कायम आहे. त्यांनी आत्महत्या केली की त्यांच्यासोबत घातपात झाला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपासही राज्य दहशतवादविरोधी पथक म्हणजेच ATS कडून केला जात होता. हा तपास NIA ला देण्याची मागणी विरोधीपक्षाकडून वारंवार केली जात होती. एनआयए आतापर्यंत केवळ उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास करत होती. तर दहशतवादविरोधी पथक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि स्कॉर्पिओ गाडी प्रकरणाचा तपास करत होते. मात्र आता तिन्ही केसचा तपास एनआयए करणार आहे.