केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सूचना: देशातील १० राज्यात रात्रीची संचारबंदी!
नवी दिल्ली|टीम ऑनलाइन
देशातील काही राज्यांमध्ये आफ्रिकेतील ओमयक्रोन व्हेरिएंटचा धोका कायम असल्याचे दिसून आल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अशा १० राज्यांमध्ये पुन्हा निर्बंधांमुळे लादण्याच्या सूचना केल्या आहेत.यासंदर्भात केरळसह १० राज्यांना पत्र पाठवून रात्रीची संचारबंदी आणि विविध कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती कमी करण्यास सांगण्यात आले आहे.
देशातील दहा राज्यांमधील २७ जिल्ह्यात ओमायक्रोनचा धोका कायम असताना कोरोना रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. तेथील पोझिटीव्हीटी रेट ५ ते १० टक्के झाला आहे. केरळमधील तर काही जिल्हे कोरोना हॉटस्पॉट बनत चालली आहेत.त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी चिंता व्यक्त करत १० राज्यांना पत्र पाठवून काही सूचना केल्या आहेत. या पत्रात म्हटले आहे की,ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट १० टक्के आहे किंवा रुग्णालयातील बेडवर ६० टक्के कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत त्याठिकाणी रात्रीची संचारबंदी लावावी, तसेच राजकीय सभा, समारंभ,धार्मिक,समाजिक आणि शैक्षणिक अशा सर्व कार्यक्रमातील उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा घालावी आणि विवाह समारंभ व अंत्यविधीसाठी कमी उपस्थिती असावी.दरम्यान, गेल्या दोन आठवड्यात केरळ,मिझोराम आणि सिक्कीम या तीन राज्यातील आठ जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हीटी रेट १० टक्के झाला आहे.सध्या देशामध्ये ओमायक्रोनचे ३३ रुग्ण उपचार घेत आहेत.त्यात महाराष्ट्र १७,राजस्थान ९, गुजरात ३ आणि दिल्ली कर्नाटकात प्रत्येकी २ रुग्णांचा समावेश आहे.