#NisargCyclone: केंद्रीय पथक रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर, चक्रीवादळाने झालेल्या नुकसानाची पाहणी होणार
रायगड: रायगड जिल्ह्यातील ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे आंतरमंत्रालयीन पथक आज मंगळवारी रायगडमध्ये येणार आहे.
मुंबईहून भाऊचा धक्का मार्गे रो-रो बोटीने हे पथक अलिबागला येणार आहे. सकाळी 10.40 वाजता नागावमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी करनार आहेत. त्यानंतर चौल येथे पाहणी करुन मुरुड तालुक्यातील बोर्लीला पाहणी करतील. त्यानंतर काशिद, नांदगाव येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली जाईल.
दुपारी 2.15 वाजता मुरुड तालुक्यातील प्रकृती रिसॉर्टमध्ये चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबतचे जिल्हाधिकाऱ्यांचे सादरीकरण केल्यानंतर मुरुड तालुक्यातील आगरदांडाकडे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली जाणार आहे. श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार, हरिहरेश्वर येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन पथकाचा रात्री महाड येथे मुक्काम असेल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
दोन दिवसांपूर्वी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नागाव येथील नुकसानीची पाहणी केली होती. तसेच वादळग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आहेत. यावेळी नागाव ग्रामपंचायतीमधील काही नुकसानग्रस्त नागरिकांना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटपही करण्यात आले आहे.