२२ जूनपर्यंत साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ नेमा, उच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश
अहमदनगर – येत्या २२ जूनपर्यंत साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ नेमण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला दिले आहेत. त्यानुसार, आता विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरू झाल्या असून अध्यक्षपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांकडून दावा केल जात आहे. नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार असल्यामुळे, या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादीने दावा केला आहे. तर काँग्रेसचा आधीपासूनच आपली दावेदारी सादर केली आहे. तर, इकडे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराचं अध्यक्षपद हे आदेश बांदेकर म्हणजेच शिवसेनेकडे गेल्याने शिर्डीसाठी आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
हायकोर्टाचे आदेश
दोन महिन्यात नवं विश्वस्त मंडळ नियुक्त करु, असं राज्य सरकारने हायकोर्टात सांगितलं होतं. मात्र त्यावर कृती न केल्याने हायकोर्टाने ताशेरे ओढले आहेत. जर चालढकल करत असाल तर तो न्यायालयाचा अवमान आहे, अशी तंबी कोर्टाने सरकारला दिली. नव्या विश्वस्त मंडळाची नेमणूक ही अधिनियम 2005 नुसार करावी लागणार आहे. या नियमानुसार राजकीय व्यक्ती विश्वस्त मंडळात नसेल. त्यामुळे आता राजकीय पक्ष जरी यासाठी फिल्डिंग लावत असले, तरी नेमकी नियुक्ती कोणाची होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.