पश्चात्तापाच्या विधानावरून नवाब मलिकांचा फडणवीसांवर निशाणा; म्हणाले, “मला दिसतंय की…!”
नवी दिल्ली |
दोन वर्षांपूर्वी अजित पवारांसोबत केलेल्या शपथविधीचा आपल्याला आता पश्चात्ताप होत असल्याची कबुली राज्याचे विद्यमान विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या मुद्द्यावरून राज्याच्या राजकीय वातावरणात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यावरून देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला लगावला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांच्या या विधानाचा समाचार घेताना, “चिडिया चुग गई खेत, अब पछताए का होय”, अशा शब्दांत प्रतिक्रिया देखील दिली आहे.
- “फडणवीसांना सत्तेशिवाय राहताच येत नाही”
देवेंद्र फडणवीसांच्या विधानावरून नवाब मलिक यांनी निशाणा साधला आहे. “सत्तेशिवाय त्यांना राहाताच येत नाहीये. दोन वर्षांपूर्वी त्यांनी हे सिद्ध करून दाखवलंय. ते सांगत राहिले की अजून वाटत नाहीये की मी मुख्यमंत्री नाही. बहुतेक दोन वर्षांनंतर खरी परिस्धिती त्यांनी स्वीकारली आहे. त्यांचा सात वर्षांपूर्वीचा व्हिडीओ होता, ज्यात ते म्हणाले होते माझं लग्न कधीही होणार नाही, मी करणार नाही. पण हे ते विसरून गेले. म्हणजे सत्तेवर येण्यासाठी ते काहीही करू शकतात, काहीही बोलू शकतात”, असं नवाब मलिक म्हणाले.