‘उद्धव ठाकरेंना अक्कल नाही’; केंद्रीय मंत्री नारायण राणेंची टीका
मुंबई : राम मंदिर ही भाजपाची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का? असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरेंनी विचारला होता. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राम मंदिर भाजपाच्या काळात बांधलं गेलं आहे हे उद्धव ठाकरे वगळून १४० कोटी जनतेला माहीत आहे असा टोला नारायण राणेंनी लगावला आहे.
नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे पागल झाले आहेत. भाजपाची सत्ता आल्यानंतर म्हणजेच २०१४ नंतर राम मंदिर निर्मितीचं काम सुरु झालं आणि आता ते पूर्ण होतं आहे. राम मंदिर कुणी बांधलं ते उद्धव ठाकरेंना वगळून देशाच्या १४० कोटी जनतेला ठाऊक आहे. उद्धव ठाकरेंना चांगलं काहीही दिसत नाही, चांगलं बोलता येत नाही. त्यामुळेच मी म्हणतो की त्याला (उद्धव ठाकरेंना) वेड लागलं आहे. त्यांची सत्ता गेल्याने आता ते काय बोलतात ते त्यांचं त्यांनाही कळत नाही.
हेही वाचा – प्रकाश आंबेडकरांच्या सेभच्या व्यासपीठाचा मागचा भाग कोसळला
राम हा देव आहे, तो काही भाजपाची प्रॉपर्टी नाही. रामाची आठवण भाजपाने ठेवली आणि मंदिर भाजपाने बांधलं आता जनता ठरवेल की त्याचं श्रेय कुणाला द्यायचं? उद्धव ठाकरेंना विकृतपणे काहीही बोलायची गरज नाही, असं नारायण राणे म्हणाले.
इंडिया आघाडी निवडणूक हरण्यासाठी तयार आहे का? त्यांच्याबरोबर जनता नाही. पाच राज्यांच्या निवडणुकींमध्ये काय झालं? आपण पाहिलं. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा एकही खासदार निवडून येणार नाही असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. आम्ही कुठलाही पैसे देऊन केलेले सर्व्हे आम्ही मानत नाही. लोकसभा निवडणुकीत विजय आमचाच होणार आहे, असंही नारायण राणे म्हणाले.