नव्या पिढीला कुटुंबाच्या प्रती जबाबदारीचे भान नाही – अजित पवार
मुंबई | प्रतिनिधी
आजची नवी पिढी कुटुंबाच्या प्रती असलेली आपली जबाबदारी विसरत चालली आहे. एका वयस्कर वडिलांना मुलाने विमानतळावर सोडले आणि बाहेर गावी निघून गेला, हे काही बरोबर नाही. आम्ही मुंबईत जास्त वेळ राहिलो तर बारामतीला कधी जातो असे होते. मात्र आजच्या मुलांना तसे काहीच वाटत नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार नव्या पिढीवर घसरले.
नव्या पिढीबद्दल नाराजी व्यक्त करताना अजित पवार म्हणाले की, आई वडील कष्टाने मुलामुलींना शिकवतात. त्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवतात. पण मुले बाहेरगावी गेली की तिकडेच लग्न करतात. तिकडेच सेटल होतात, परत यायचं नाव घेत नाही. अर्थात सगळीच मुले असे करीत नाहीत. त्यांना आई वडिलांच्या कष्टाची जाण असते. पण काही मात्र बंडलबाज असतात. त्यांना कुटुंबाच्या प्रती जबाबदारीचे भान नसते. मात्र चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे असतात. हे सर्वांनीच कायमचे लक्षात ठेवायला हवे, असे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले.





