ताज्या घडामोडीमुंबई

भोंग्यांनाही घाबरता, फडणवीस यांचा ठाकरे सरकारला टोला

 मुंबई | ‘बाबरी मशिदीचा ढाचा पाडला गेला, तेव्हा तिथे शिवसेनेचा एकही नेता उपस्थित नव्हता. मात्र हा ढाचा आम्ही पाडला असून त्याचा आम्हाला अभिमान आहे’, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी शिवसेनेला लक्ष्य केले. बाबरी मशिद पाडली तेव्हा तुम्ही कोणत्या बिळात होता, असे हे विचारतात. मात्र, ज्यांना मशिदीवरील भोंगे उतरविणे जमत नाहीत, ते काय बाबरी मशिद पाडणार, असे म्हणत फडणवीस यांनी राज्यातील उद्धव ठाकरे सरकारलाही टोमण्यातून प्रत्युत्तर दिले.

मुंबईतील ‘बूस्टर’ सभेत बोलताना फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. ‘बाबरी मशिद पाडली, तेव्हा तुम्ही कुठल्या बिळात होता, असे हे आम्हाला विचारत आहेत. त्यांना मशिदीवरील भोंगे काढायला लावले तर ते घाबरले. हे बाबरी मशिद काय पाडणार? वास्तविक ती मशिद नव्हे तर तो बाबरी ढाचा होता. कोणीही हिंदू मशिद पाडू शकत नाही. तो पारतंत्र्याचा ढाचा होता आणि आम्ही तो पाडला. बाबरी मशिद पाडल्याप्रकरणामध्ये ३२ आरोपी होते. त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, उमा भारती आदींचा समावेश होता. मात्र तुमचा महाराष्ट्रातील कुठलाच नेता पाहायला मिळत नाही. आमचे नेते ३० वर्षे खटले लढत होते. आम्हाला प्रसिद्धी करता येत नाही आणि शिस्तही मोडता येत नाही. मात्र माझा सवाल आहे, तो ढाचा पडला तेव्हा तुम्ही कुठे होता? मी अभिमानाने सांगतो, तो ढाचा पाडला, तेव्हा मी त्याच ठिकाणी होतो. एवढेच नाही तर त्याआधी कारसेवेमध्ये याच राम मंदिरासाठी बदायूच्या तुरुंगात मी १८ दिवस घालवले’, असेही ते म्हणाले.

‘बाबरीचा ढाचा पाडला जात होता, तेव्हा तुम्ही गोळीबार करण्यास परवानगी दिली नाही, असे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंह यांना विचारण्यात आले होते. तेव्हा, तिथे साडेतीन लाख कारसेवक होते आणि त्यांच्यावर मी गोळी चालवू देणार नाही, असे ते म्हणाले होते. कल्याणसिंह यांनी सरकार पणाला लावले आणि महाराष्ट्रात मात्र राम अस्तित्वात होते का, असा प्रश्न विचारणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून हे सत्तेत बसले आहेत,’ असा टोला फडणवीस यांनी ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक यांचे उदाहरण देताना, मुख्यमंत्र्यांचे आतापर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’ आम्हाला माहीत होते. मात्र, आता ‘वर्क फ्रॉम जेल’ सुरू झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

‘राणा दाम्पत्यावर हनुमान चालीसा म्हटल्यामुळे राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे. हनुमान चालीसा म्हणण्यामागे या दाम्पत्याचा राज्य सरकार उलटवण्याचा डाव होता, असा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. हनुमान चालीसा म्हटल्याने रामाचे राज्य उलथवले जाणार आहे की रावणाचे? त्यामुळे तुम्ही रामाच्या बाजूने आहात की, रावणाच्या हे एकदाच स्पष्ट करा’, असे ते म्हणाले.

‘तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही’

‘काश्मीरमधील ३७० कलम हटवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा वाघ तयार झाला, असे ते म्हणाले. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही आणि आज हेही सांगण्याची वेळ आली आहे की, तुम्ही म्हणजे हिंदू नाही… पण मी हे म्हणणार नाही. कारण मला हिंदूंची संख्या कमी करायची नाही. हनुमान चालीसा म्हणून बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही, असे शरद पवार सांगतात. मग इफ्तार पार्ट्या करूनही प्रश्न सुटणार नाही’, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

‘मुंबई माफियामुक्त करायची आहे’

‘बाळसाहेबांवर विश्वास ठेऊन आम्ही मुंबई शिवसेनेच्या हाती दिली होती. आम्हाला वाटायचे राज्यात भगवी सत्ता आहे. मात्र, आता तसे राहिलेले नाही. त्यांनी मुंबईला लुटण्याचे काम केले आहे. कोविड काळात तर सर्वसामान्यांपेक्षा विकासकांचे, बार चालकांचे आणि मद्यपान करणाऱ्यांचे भले झाले. त्यामुळेच आता मुंबईच्या स्वातंत्र्यासाठी लढायचे आहे. मी असे म्हटल्यावर लगेचच यांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे, असे म्हटले जाईल. मात्र तसे नसून मुंबई ही महाराष्ट्राचीच राहणार आहे. मात्र हे भावनिक गोष्टीतून मराठी माणाला लुबाडत असून ते आता आम्ही पुढे चालू देणार नाही. मुंबईला माफिया तसेच लूटमारांच्या हातून सोडवायचे असून आम्हाला पुन्हा मुंबईकरांच्या हातात मुंबई सोपवायची आहे. त्यासाठीच महाराष्ट्र दिनी तुम्ही सज्ज व्हा’, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button