दिल्ली-एनसीआरमध्ये एअरटेलच्या मोबाईल नेटवर्कमध्ये अडथळा
ना कॉल्स,ना इंटरनेट एअरटेलचे नेटवर्क डाऊन; कामकाज ठप्प
मुंबई/नवी दिल्ली : सोमवारी दिल्ली-एनसीआरमध्ये एअरटेलच्या मोबाईल नेटवर्कमध्ये मोठा अडथळा निर्माण झाला. अनेक वापरकर्त्यांनी कॉल कट होणे, पूर्णपणे सिग्नल गायब होणे आणि इंटरनेटचा वेग मंदावणे अशा तक्रारी केल्या. या अडचणीमुळे युझर्सनी सोशल मीडियाचा आधार घेत एअरटेलविरोधात नाराजी व्यक्त केली. त्यानंतर दूरसंचार कंपनीने अधिकृतरित्या समस्येची दखल घेतली.
एअरटेलची ग्राहक सेवा युनिट Airtel Cares ने या व्यत्ययाबद्दल माहिती देत सांगितले की त्यांची टीम तातडीने समस्या सोडवण्याच्या प्रयत्नात आहे. लवकरात लवकर सेवा पूर्ववत करण्याचे काम सुरू असल्याचे कंपनीने म्हटले आहे. एका वापरकर्त्याला उत्तर देताना Airtel Cares ने लिहिले, सध्या नेटवर्क आउटेज होत आहे. आमची टीम सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे. झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून क्षमस्व आहोत.
हेही वाचा : जयगड सोसायटीमध्ये स्वखर्चाने ३० किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वयीत!
या अचानक झालेल्या नेटवर्क बंदमुळे ग्राहकांमध्ये मोठी चीड निर्माण झाली असून अनेकांनी X वर थेट एअरटेलला टॅग करत प्रश्न विचारले. एका वापरकर्त्याने लिहिले – दिल्लीमध्ये एअरटेल नेटवर्क बंद आहे का? गेल्या एका तासापासून कॉलिंगमध्ये प्रॉब्लेम आहे, इनकमिंग-आउटगोइंग दोन्ही बंद आहेत. दुसऱ्याने नाराजी व्यक्त करत लिहिले – दिल्लीमध्ये नेटवर्क नाही, OTP मिळत नाहीयेत, @airtelindia तुम्ही ही समस्या कधी सोडवणार?” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले – फक्त माझ्याच मोबाईलमध्ये प्रॉब्लेम आहे का? एअरटेल नेटवर्क अजिबात चालत नाही, कॉल्स कनेक्ट होत नाहीत.
सध्या तरी एअरटेलने या व्यत्ययामागील नेमके कारण किंवा सेवा पूर्णपणे केव्हा पूर्ववत होईल याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र या नेटवर्क डाऊनमुळे वैयक्तिक संवादापासून ते प्रोफेशनल कामकाजापर्यंत मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण झाला आहे.





