अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळ परिसरात काँग्रेस-भाजपा आमनेसामने
मुंबई – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. सभागगृहाबाहेर एकीकडे काँग्रेस आमदार केंद्रातील मोदी सरकाविरोधी, तर दुसरीकडे भाजपा नेते राज्य सरकारविरोधात घोषणा देत होते.
वाचा :-मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरेंनी फडणवीसांना सोपवली ‘ही’ जबाबदारी
मिळलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेत्यांकडून इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढण्यात आली होती. महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर काँग्रेस आमदार सायकलवरुन विधानभवानाकडे रवाना झाले. रॅली विधानभवनाजवळ पोहोचताच काँग्रेस आणि भाजपा आमदार आमने-सामने आले.
यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले, ‘केंद्रातील मोदी सरकारने ज्या पद्धतीने महागाई वाढवण्याचा विक्रम केला आहे त्यामधून सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल केले आहे. काँग्रेसच्या वतीने देशभरात विरोध होत आहे. परवा पेट्रोलियम मंत्र्यांनी थंडीमुळे भाव वाढल्याचा जावईशोध लावला. या पद्धतीने वारंवार थट्टा करण्याचा केंद्रातील मोदी सरकारकडून जो प्रयत्न सुरू आहे, लोकांच्या तोंडातील घास हिसकावून घेण्याचे काम सुरू केले आहे त्याचा विरोध आम्ही करत आहोत.’





