MPSC च्या जाहिरातीत आरक्षणानुसार जागावाटप नाही; धनगर, वंजारी समाजाच्या विद्यार्थ्यांचा आरोप
पुणे | महाईन्यूज|
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पोलीस उपनिरीक्षकपदाच्या 650 जागांसाठी निघालेल्या एका नव्या जाहिरातीमुळे वाद निर्माण झाला आहे. यामध्ये आरक्षणानुसार जागावाटप झाला नसल्याचा आरोप एमपीएससीची तयारी करणाऱ्या धनगर आणि वंजारी समाजाच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. हा प्रश्न धनगर आणि वंजारी समाजाशी निगडीत आहे. धनगर समाज हा एनटीसी तर वंजारी समाज हा एनटीडी प्रवर्गात मोडतो.
एमपीएससीची पीएसआय, एसटीआय, एएसओ पदांसाठी काल म्हणजे 28 फेब्रुवारीला जाहिरात निघाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एकूण 806 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. त्यात पोलीस उपनिरीक्षक पदासाठी 650 जागा आहेत. परंतु या पदांमध्ये आरक्षणाप्रमाणे धनगर समाजाला 24 जागा मिळणं अपेक्षित असताना फक्त दोन जागा मिळाल्या आहेत, असा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे. तर वंजारी समाजासाठी एकही जागा निघाली नाही, असं या मुलांनी सांगितलं.
आयोगाने नेमक्या कोणत्या निकषावर या जागा काढल्या, अशी विचारणा विद्यार्थ्यांनी केली आहे. जातींना ठरलेल्या आरक्षणाप्रमाणे एमपीएससीने जागा काढाव्यात अशी मागणीही या विद्यार्थ्यांनी केली आहे.
दरम्यान एनटी- ड व एनटी – क प्रवर्गातील विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर व्हावायासाठी येत्या दोन दिवसात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत तातडीची बैठक घेणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. दोन्ही प्रवर्गासाठी शासन निर्णयाप्रमाणे जागा आरक्षित करुन सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी, अशी विनंती गृहमंत्र्यांना करणार असल्याचंही धनंजय मुंडे म्हणाले.