मान्सूनने दिली आनंदाची बातमी; केरळमध्ये ३ दिवस आधी बरसला, महाराष्ट्रात कधी?
मुंबई: केरळमध्ये मान्सून नियमीत वेळेच्या ३ दिवस आधी दाखल झाल्याने मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे. गेल्या २ अडीच महिन्यांपासून उकाडा सहन करणाऱ्या देशातील जनतेला आता लवकरच दिलासा मिळणार आहे. गेल्याच आठवड्यात महाराष्ट्रासह उत्तर भारतातील सर्व राज्यांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला होता. आता हवामान विभागाने आणखी एक चांगली बातमी दिली आहे.
IMDने दिलेल्या माहितीनुसार केरळमध्ये मान्सून २-३ दिवस आधीच म्हणजे २९ मे रोजी दाखल झालाय. यामुळे आता तो इतर राज्यात कधी पोहोचतोय याची उत्सुकता लागली आहे. सर्वाधिक उत्सुकता कर्नाटक आणि महाराष्ट्रातील नागरिकांना असेल. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार केरळच्या अन्य भागासह कर्नाटक आणि महाराष्ट्रातील किनारपट्टी भागात मान्सून आधी पोहोचेल.
केरळमध्ये पुढील ५ दिवस वादळासह जोरदार पाऊस पडू शकतो. राजधानी नवी दिल्लीत आज ३० मे रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. येथील तापमान २८ डिग्री ते ४१ डिग्री दरम्यान असू शकते. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनच्या पुढील प्रवासाला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे पुढील चार दिवस दक्षिण कोकण, दक्षिण मध्ये महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात येणार या तारखेला
गेल्या २४ तासात गोव्यासह कोकणात पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील अन्य ठिकाणी तापमानात घट नोंदवण्यात आलीय. मान्सूनच्या वाटचालीसाठीची अनुकूलता अशीच कायम राहिल्यास राज्यात ८ किंवा १० जून रोजी मान्सून बरसण्यास सुरूवात होईल.