राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुग्धाभिषेक
मुंबई |
बंगळुरू इथं काल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचे संतप्त पडसाद महाराष्ट्रासह कर्नाटकातही उमटत आहेत. बेळगाव शहरातील शिवप्रेमी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते यांनी संताप व्यक्त केला असून शिवप्रेमींनी या घटनेच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलनही केलं. तसंच समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी याविषयी ट्वीट करत माहिती दिली. आपल्या ट्वीटमध्ये पाटील म्हणतात, कर्नाटकात काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली आहे. याच पार्श्वभूमीवर १९ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जाऊन महाराजांना दुधाचा अभिषेक करतील.छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. उद्या महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक करून पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी अभिवादन करतील.
कर्नाटकात काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या, दिनांक १९ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जाऊन महाराजांना दुधाचा अभिषेक करतील.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) December 18, 2021
या घटनेचे तीव्र पडसाद सध्या महाराष्ट्रासह कर्नाटकातही उमटत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेची निंदा केली असून आपला संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः पंतप्रधान मोदींनी या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी ठाकरे यांनी केली आहे. छत्रपतींचे नाव केवळ राजकारणासाठी घ्यायचे आणि आमच्या दैवताचा अनादर झाल्यावर मात्र बोटचेपी भूमिका घ्यायची. हे कदापिही खपवून घेतले जाणार नाही. मराठी अस्मितेला डिवचणे परवडणारे नाही हे ध्यानात घ्यावे. यात केंद्र सरकारनेही दुतोंडी भूमिका सोडून ठोस पावले उचलावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वत: यात लक्ष घालावे आणि तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे अशा तीव्र शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.