breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

दरडग्रस्तांना पुन्हा स्थलांतराच्या नोटिसा, मुंबईत ठोस उपाययोजनांचा अभावच

मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरडींखाली राहणाऱ्या रहिवाशांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईत विविध ठिकाणी सुमारे २० ते २२ हजार झोपड्या दरडींच्या छायेत आहेत. दरवर्षी पावसाआधी येथील रहिवाशांना स्थलांतराच्या नोटिसा बजावण्यापलीकडे कोणतीही ठोस उपाययोजना सरकार आणि पालिकेकडून होत नाहीत. यंदाही पावसाच्या तोंडावर पालिकेने भांडुप, विक्रोळी, पवईतील रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याच्या नोटीसा दिल्या आहेत.

महिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिका, म्हाडाकडून मिळवलेल्या माहितीनुसार मुंबईतील ३६पैकी २५ विधानसभा मतदारसंघांमध्ये ३२७ ठिकाणे दरडीखाली असून, डोंगराळ भागातील २५७ ठिकाणे धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. या भागात २२ हजार ४८३ कुटुंबीय असून, त्यापैकी ९ हजार ६५७ कुटुंबीयांना प्राधान्याने स्थानांतरित करण्याची शिफारस मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने राज्य सरकारला केली आहे. यात उर्वरित झोपड्यांना टेकड्यांच्या आजुबाजूला तटबंदी लावून संरक्षित करण्याचे प्रस्तावित केले होते. त्यापैकी जवळपास सर्वच ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्यात आल्या आहेत. मात्र संरक्षक भिंतींपेक्षा नागरिकांना कायमस्वरूपी सुरक्षितस्थळी हलवणे हाच यावरचा उपाय असल्याचे गलगली यांनी सांगितले.

  • …तर पालिका जबाबदार नाही

पावसाळ्याआधीची नेहमीची कारवाई म्हणून मुंबई महापालिकेने दरडींच्या आजुबाजूला घरे असलेल्यांना स्थलांतरित होण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत. यंदाच्या पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास पालिका जबाबदार नाही, अशी भूमिका महापालिकेने मांडली आहे. पालिकेने भांडुप, विक्रोळी या ‘एस’ विभागातील विक्रोळी सूर्यनगर, पवई इंदिरानगर, गौतम नगर, पासपोली, जयभीम नगर, गौतमगर; तसेच भांडुप पश्चिम येथील रमाबाई आंबेडकर नगर भाग १ व २, नरदास नगर, गांवदेवी टेकडी, गावदेवी मार्ग, टेंभीपाडा, रावते कम्पाऊंड, खिंडीपाडा, रामनगर, हनुमान नगर, अशोक टेकडी, आंब्याची भरणी, डकलाइन रोड, नवजीवन सोसायटी, तानाजी वाडी, दर्गा रोड, खदान विश्वशांती सोसायटी या ठिकाणच्या टेकडीच्या/डोंगराच्या उतारावर वसलेल्या झोपडपट्टीवासींना भूस्खलनामुळे घरांची पडझड होण्याचीही शक्यता असून, सावधगिरीची नोटीस बजावली आहे. रहिवाशांनी स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवित अथवा वित्तहानी झाल्यास पालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने सन २०१०मध्ये दरडींखाली राहणाऱ्या रहिवाशांचे सर्वसमावेशक सर्वेक्षण करण्याची शिफारस केली होती. त्यावर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. मात्र १२ वर्षांनंतरही नगरविकास विभागाने अद्याप त्याची अंमलबजावणी केलेली नाही. सरंक्षण भिंतीवर आजमितीला ३०० कोटी रु. खर्च केले असून, इतक्या पैशात या रहिवाशांचे पुर्नवसन करणे शक्य होते, अशी माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली. गेल्या वर्षी चेंबूरमधील भारत नगर आणि विक्रोळीतील सूर्यानगर येथे दरड कोसळून ३०हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतरही सरकारी यंत्रणांचे डोळे उघडलेले नाहीत.

  • आयआयटीच्या सूचनांकडे दुर्लक्ष?

दरडींखालील झोपड्यांबाबत सन २०१०मध्ये मुंबई आयआयटीने अहवाल बनवून तो म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाकडे सादर केला होता. या अहवालानुसार ९ मीटर उंचीपर्यंत संरक्षक भिंत उभारण्याची सूचना केली. ९ मीटर उंचीपेक्षा जास्त उंचीच्या ठिकाणी कोकण रेल्वेच्या धर्तीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे ठरवण्यात आले. विविध तांत्रिक उपाययोजनांसाठी ४५ कोटी ५७१ लाख ३१ हजार रुपयांच्या निधीची गरज असल्याचे आयआयटीने सुचवले होते. मात्र रहिवाशांचे स्थलांतर करून पुनर्वसनाच्या उपाययोजना करण्याऐवजी पर्याय म्हणून संरक्षक भिंती बांधल्या जात आहेत. या भिंतीही निकृष्ट दर्जाच्या असल्याने त्या पुन्हा बांधून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असल्याचे आढळून येत आहे.

> दरडींचे भाग झोपड्या

> मुंबई शहर ४९ ३९८६

> पूर्व-पश्चिम उपनगर २७८ १८,४९७

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button