मुंबईत मराठा आंदोलकाची आत्महत्या; मनोज जरांगे पाटील म्हणाले..
मुंबई : मराठा आंदोलनात सक्रिय असलेल्या सुनील कावळे या आंदोलकाने मुंबईत आत्महत्या केली असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी दिली. यामुशे आता मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखी पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान, यावरून मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारव रोष व्यक्त केला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, सरकारने बळी घ्यायचं का ठरवले आहे हे कळत नाही. सरकारमुळे बळी पडायला लागले आहेत. भावांनो आरक्षण मिळणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही. खूप वर्ष दम धरला आहे. थोडे दिवस आणखी दम धरा. तुमच्या पायाला हात लावून सांगतो पोरं जायला लागले, आत्महत्या करायला लागले तर आरक्षण घेऊन उपयोग काय? तुम्ही दम धरा. पण हे सगळं पाप सरकारचं आहे.
हेही वाचा – World Cup 2023 : भारत वि. बांगलादेश यांच्यात आज चुरशीची लढत! पाहा सर्व माहिती..
सरकारला किती मुडदे पाडायचे आहेत माहीत नाही. एक माणूस कमी झाला. याला पूर्ण जबाबदार सरकार आहे. आता तरी त्याचं बलिदान वाया जाऊ देऊ नये. सरकारने आता तातडीने मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा. २४ तारखेनंतर होणारं आंदोलन सरकारला परवडणार नाही, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
या आत्महत्येला फक्त सरकार जबाबदार आहे. आमच्या हक्काचा असणारा विषय ताबडतोब मिटवला तर ही वेळ येणारच नाही. मराठा समाजाचा अंत सरकारने पाहू नये. बलिदान वाया जाऊ देणार नाही. २४ तारखेनंतर होणारं शांततेचं आंदोलन सरकारला स्वस्थ बसू देणार नाही. असं काही ऐकल्यानंतर खूप वेदना होतात. या वेदना थोडे दिवस सहन करा. पाया पडून सांगतो कोणी आत्महत्या करू नका. आमच्या परिवारातील आमचा भाऊ गेला आहे. आमचा माणूस गेला आहे तो परत येणार नाही. सरकारने तातडीने आरक्षण द्या. २४ तारीख उजाडू देऊ नका. आम्ही मराठे हे बलिदान वाया जाऊ देणार नाही, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.