‘लोकसभा निवडणुकीत मोदी सत्तेत आल्यास विधानसभा निवडणुकाच होणार नाहीत’; पृथ्वीराज चव्हाण
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आगामी निवडणुकांवरून मोठं विधान केलं आहे. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची सत्ता आल्यास विधानसभा निवडणुकाच होणार नाहीत, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. त्यांच्या या दाव्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्यात आमची तीन पक्षाची आघाडी आहे. आम्ही राज्यात एकास एक उमेदवार देण्यावर भर देणार आहोत. महाविकास आघाडी राज्यातील जागा वाटप एकत्र बसवून ठरवेल. यावेळी जागा वाटपावरून वादावादी होईल, घासाघीस होईल, एखाद दोन जागेवरून स्पर्धाही होईल. पण आम्ही जागा वाटपाचा प्रश्न सामंजस्याने सोडवू. भाजप सरकार येऊ नये म्हणून आम्ही एकास एक उमेदवार देऊ. लोकसभा निवडणुकीत मोदी परत आले तर राज्यात विधानसभा निवडणूकच होणार नाही.
हेही वाचा – मुंबईत मराठा आंदोलकाची आत्महत्या; मनोज जरांगे पाटील म्हणाले..
पक्षांतर बंदी कायदा कुचकामी ठरला आहे. ही दुर्देवी गोष्ट आहे. विधानसभा अध्यक्ष अजूनही आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय देत नाहीत. सर्वोच्च न्यायालय हतबल आहे. आता सर्वोच्च न्यायालयानेच ठोस निर्णय घेतला पाहिजे. विधानसभा अध्यक्ष एका पक्षाचे आहेत. त्यामुळे ते आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर काही निर्णय लवकर देतील असं वाटत नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
ससूनमधून ड्रग्स माफिया फरार होतो, हे गृहखात्याचं अपयश आहे. गृहमंत्र्यांनी या सर्व प्रकरणाची जबाबदारी घ्यावी. पण या सरकारमध्ये नैतिकता राहिलीच नाही. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची बाबही गंभीर आहे. त्यामुळे आता सरकार बदलणं हाच एकमेव पर्याय आहे. सरकार बदललं पाहिजे, असं सांगतानाच ससून प्रकरणात अनेक मंत्र्यांची नावे येत आहेत. पण या प्रकरणातील सगळं समोर येईल की दडपलं जाईल माहिती नाही. पण जे घडतं ते दुर्दैवी आहे, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.