मनोज जरांगेंचा एकेरी उल्लेख करत छगन भुजबळांवर हल्लाबोल; म्हणाले..
मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक युद्ध अद्याप सुरू आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी भुजबळांचा एकेरी उल्लेख करत जोरदार हल्लाबोल केला आहे. जेसीबीने फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यावरून होत असलेल्या टीकेवर बोलताना जरांगेंनी भुजबळांवर टीकास्त्र सोडलं आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, जेसीबीने फुलं टाकून स्वागत करणं हे शक्तीप्रदर्शन नाही. आम्ही एकमेकांशी संवाद साधत आहोत. आम्ही आमच्या समाजातील लेकरांना न्याय मिळावा म्हणून एकत्र येत आहोत. त्याला यात जेसीबी आणि फुलच दिसत आहेत. त्याने आरक्षणही पहावं. त्याचे काय डोळे गेले आहेत का? त्याने आरक्षण द्यायचंही बघावं, तिकडेही लक्ष द्यावं.
हेही वाचा – पुण्यात मराठी पाटी नसणाऱ्या दुकानांची मनसेकडून तोडफोड
३२ लाख लोकांना आरक्षण मिळालं. आयुष्याची भाकरी मिळाली म्हणून आनंदात ते जेसीबी, फुलं आणत आहेत. त्याला केवळ जेसीबी दिसत आहेत, ७० वर्षांपासून आरक्षण नाही तेही दिसू दे. तो स्वतः आरक्षण खातो आणि आमचंही आरक्षण बुडाखाली घेऊन बसला आहे. त्याचे काय डोळे गेले आहेत का? हे पोरं त्रास-वेदना सहन करत आहेत. त्याने तेही बघावं, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
पावसाने शेतकऱ्यांचं नुकसानही झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. सरकारला विनंती आहे की, त्यांना उघड्यावर पडू देऊ नका. राज्य आणि देश जगवणारा शेतकरी वर्ग आहे. त्यांच्या फार हालअपेष्टा होत आहेत. त्यांना तातडीने निधी द्या. पंचनामेही करा. काही ठिकाणी पंचनामेही सुरू नाहीत. बऱ्याच अधिकाऱ्यांना पंचनामे करायला वेळच नाही वाटतं, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.