मनोज जरांगे पाटील यांचा वैद्यकीय तपासणीला नकार, १४ दिवसांपासून उपाशी
Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जालन्यात मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. गेल्या १४ दिवसांपासून हे आमरण उपोषण सुरू आहे. राज्य सरकारकडून वारंवार त्यांना उपोषण मागे घ्यावं यासाठी आवाहन केलं जात आहे. मात्र जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान, जरांगे पाटील यांनी वैद्यकीय तपासणीलाही नकार दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला चार दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. चार दिवसांत सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर पाणी आणि औषधांचा त्याग करण्याचा इशारा दिला होता. तसंच औषधं घेण्यास नकार दिला असून डॉक्टरांनी लावलेल्या सलाईन काढून टाकल्या आहेत. एवढंच नाही तर वैद्यकीय तपासणीलाही त्यांनी विरोध केला आहे.
हेही वाचा – साताऱ्यातील पुसेसावळीत दोन गटांमध्ये राडा, दोन गुन्हे दाखल
डॉक्टर म्हणाले, काल एकदा तपासणी झाली. त्यानंतर आमच्याकडून तपासणी होऊ शकली नाही. वैद्यकीय तपासणीसाठी आम्ही त्यांना विनंती करतो आहोत. आज सकाळच्या टीमनेही विनंती केली, पण त्यांना तपासणीला नकार दिला. कालपासून पाणीही प्यायले नाहीत. शरीरातील पाण्याची पातळी कमी होणं, ब्लड शुगर लेव्हल कमी होणं या गोष्टींचा थेट संबंध आहे. यावरून कळतं त्यांची प्रकृती कशी आहे. वैद्यकीय तपासणी न झाल्याने त्यांच्या प्रकृतीविषयी सांगू शकत नाही. परंतु ब्लड शुगर, ब्लड प्रेशर खालच्या पातळीवर आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.