ममता बॅनर्जीनी निवडणूक आयोगाला फटकारले
नवी दिल्ली |
पश्चिम बंगालमधील सत्तारूढ तृणमूल काँग्रेसने निवडणुकीशी संबंधित अनेक तक्रारी नोंदवूनही निवडणूक आयोगाने (ईसी) कोणतीही कारवाई न केल्याबद्दल राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी आयोगाला फटकारले आणि याविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या नंदीग्राम मतदारसंघात हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या. गुरुवारी सकाळपासून आम्ही ६३ तक्रारी नोंदविल्या, मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे आम्ही याविरुद्ध न्यायालयात दाद मागणार आहोत, हे स्वीकारार्ह नाही, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
निवडणूक आयोग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेनुसार काम करीत असल्याचा आरोप या वेळी ममतांनी केला. इतर राज्यांमधून आणण्यात आलेल्या गुंडांनी येथे गोंधळ माजवला आहे, मतदारांना धमकावण्यासाठी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने भाडोत्री गुंड आणल्याचा आरोप ममतांनी केला आहे. बोयालमधील मतदान केंद्र क्रमांक सात येथे फेरमतदान घेण्याची मागणी त्यांनी केली आहे, तृणमूल काँग्रेसच्या कार्यकत्र्यांना भाजप समर्थक मारहाण करीत आहेत, असा आरोपही ममतांनी केला.
- नंदीग्राममधील हिंसाचार अहवाल सादर करण्याचे आदेश
नंदीग्राम मतदारसंघातील बोयाल येथे हिंसक घटना घडल्या त्याबद्दलचा अहवाल सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने गुरुवारी प्रशासनाला दिले. बोयाल परिसरातील मतदान केंद्राबाहेर झालेल्या हिंसक घटनेबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश निवडणूक उपायुक्त सुदीप जैन यांनी प्रशासनाला दिले.