“महायुतीने चांगलं काम केल्याने आम्ही विजयाची गुढी उभारु शकलो”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विधान

Eknath Shinde : राज्यभरात आज गुढीपाडव्यानिमित्त आनंदाचे वातावरण असून सर्वत्र विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू नववर्षाच्या शोभायात्रेत ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले. तसेच इतर दिग्गजांचीही उपस्थिती होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि अडीच वर्षांत महायुतीने चांगलं काम केल्याने आम्ही विजयाची गुढी उभारु शकलो असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, “आजचा दिवस मांगल्य आणि पावित्र्याचा दिवस आहे. आज ठाण्यातील कोपीनेश्वर महादेव मंदिराच्या वतीने जी शोभा यात्रा काढली जाते त्याचं २५ वं वर्ष आहे. या शोभायात्रेत अनेक चित्ररथ असतात. चित्ररथांमधून सामाजिक संदेश देण्याचं काम, समाज प्रबोधनाचं काम हे दाखवलं जातं. मागच्या अडीच वर्षांत महायुतीने जे काम केलं त्यामुळे विजयाची गुढी आम्हाला उभारता आली.”
हेही वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री लक्ष्मी नृसिंह देवतांचे दर्शन
“नव्या सरकारची पहिली इनिंग सुरु झाली आहे. समृद्धी आणि विकास यांच्या गुढ्या उभारणार आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार. चैत्र नवरात्र उत्सव आहे तो नऊ दिवसांचा उत्सव आहे. राज्यात विकास, लोकांची प्रगती, कायदा-सुव्यवस्था, लाडक्या बहिणी, भाऊ, लाडके शेतकरी या सगळ्यांची प्रगती साधणं हे आमचं ध्येय असणार आहे,” असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, गुढीपाडव्यानिमित्त मुंबईतील गिरगाव, ठाणे, डोंबिवली आणि नागपूर या ठिकाणी शोभायात्रांचा उत्साह दिसून येत आहे. पारंपरिक वेशभुषा करुन, त्याचप्रमाणे बाईक रॅली काढत मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहिले आहेत.