मुंबई महापालिकेवर पुन्हा झेंडा फडकवण्यासाठी उद्धव ठाकरेंची रणनिती; 12 शिलेदार मैदानात उतरवले

मुंबई : मुंबई महानगरपालिका पुन्हा जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) पक्षाने मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. महापालिका निवडणुकीसाठी सरकारने प्रभाग रचनेचे आदेश दिल्यानंतर लगेचच ठाकरे गटाने मैदानात झेप घेतली असून, पक्षाचे 12 उपनेते विशेष जबाबदाऱ्यांसह नियुक्त करण्यात आले आहेत.
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी संघटनात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षाची विधानसभा निहाय बांधणी पूर्ण होत असून, मराठी मतदार, पायाभूत सुविधा, आणि प्रशासनावरील नियंत्रण या मुद्द्यांवर ठाकरे गट आक्रमकपणे मैदानात उतरणार आहे.
पक्षाने मुंबईतील विविध विधानसभा मतदारसंघानुसार 12 प्रमुख नेत्यांवर विशेष जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत –
अमोल कीर्तीकर – दहिसर, बोरिवली, मागाठाणे
उद्धव कदम – चारकोप, कांदिवली, मालाड पश्चिम
विलास पोतनीस – दिंडोशी, गोरेगाव, जोगेश्वरी पूर्व
विश्वास नेरूरकर – वर्सोवा, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम
रवींद्र मिर्लेकर – विलेपार्ले, वांद्रे पूर्व-पश्चिम
गुरुनाथ खोत – चांदिवली, कलीना, कुर्ला
नितीन नांदगावकर – विक्रोळी, भांडुप, मुलुंड
सुबोध आचार्य – घाटकोपर पूर्व-पश्चिम, शिवाजीनगर-मानखुर्द
मनोज जमसूतकर – अनुशक्ती नगर, चेंबूर, सायन कोळीवाडा
अरुण दूधवडकर – धारावी, माहीम, वडाळा
अशोक धात्रक – वरळी, दादर, शिवडी
सचिन अहिर – मलबार हिल, कुलाबा, मुंबादेवी
हेही वाचा – अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा; अर्धन्यायिक अधिकार प्राप्त, तक्रारींचा निपटारा जलदगतीने शक्य
राज्य सरकारकडून महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी नव्याने प्रभाग रचनेचे आदेश जाहीर झाले आहेत. ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ वर्गातील महापालिकांमध्ये ही रचना लागू होणार असून, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, पिंपरी-चिंचवड, वसई-विरार, नवी मुंबई आदी शहरांचा समावेश आहे.
गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे स्थानिक निवडणुका रखडल्या होत्या. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक यंत्रणा हालचालीत आली आहे. प्रभागनिहाय लोकसंख्या, स्थानिक गरजा, आणि प्रशासकीय ढांचा लक्षात घेऊन अंतिम आराखडा लवकरच जाहीर होणार आहे.
मुंबई महापालिका ही शिवसेनेसाठी फक्त निवडणूक नसून, पक्षाच्या अस्तित्वाचा आणि बालेकिल्ल्याचा सवाल आहे. त्यामुळे ठाकरे गटाची ही मोहीम आगामी महापालिका निवडणुकीत मोठा प्रभाव टाकण्याची शक्यता आहे.





