‘भारत टॅक्सी’ला टक्कर देण्यासाठी राज्यात सुरू होणार छावा ॲप; टॅक्सी सेवेत प्रवाशांना मिळणार विविध पर्याय

मुंबई : केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात सहकारी तत्वावर भारत टॅक्सीचे उद्घाटन झाले. मात्र त्यामुळे ओला आणि उबर सारख्या जागतिक कंपन्यांसमोर आव्हान उभे राहिले आहे. आता भारत ॲपला टक्कर देण्यात राज्यात लवकरच छावा ॲप सुरू होणार आहे. परिणामी, ॲप आधारित टॅक्सी सेवेत प्रवाशांना विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत.
ओला आणि उबरसारख्या खासगी ॲप आधारित कंपन्यांकडून जादा प्रवासी भाडे, चालकांना कमी मोबादला, प्रवाशांना योग्य सुविधा पुरवली जात नसल्याच्या तक्रारी येत होत्या. या त्रासातून सुटका करण्यासाठी ५ फेब्रुवारी रोजी भारत टॅक्सी सुरू करण्यात आली. भारत टॅक्सीमध्ये चालक हेच मालक असतील. ही एक सहकारी संस्था आहे. ओला-उबर सारख्या कंपन्यांमध्ये चालकाला प्रत्येक फेरीसाठी १५ ते ३० टक्के मोबदला कंपनीला द्यावा लागतो.
हेही वाचा – रिक्षा आणि कॅबने उद्या प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचा…
भारत टॅक्सी चालकाला मोबदल्याऐवजी पूर्ण पैसे मिळतील. त्यामुळे चालकांचा यात फायदा होणार आहे. आता उबर आणि ओलाच्या मॉडेल्समध्ये बदल करण्यात येत आहे. परंतु पूर्वी चालक हे भागधारक नव्हते. स्वस्त असूनही यात महिलांसाठी पॅनिक बटन, रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि विमा संरक्षण यांसारख्या सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध असणार आहेत. यामुळे ही प्रवाशांचे पैसे वाचवणारी भारतीयांची स्वतःची टॅक्सी सेवा असणार आहे.
भारत टॅक्सीमध्ये चालक आणि प्रवासीभिमुख सेवा प्रदान केल्या आहेत. तसेच राज्यात छावा ॲप आधारित कॅब सेवा सुरू करण्यात येणार आहे. छावा ॲप राज्य शासनाच्या परिवहन विभागाच्या सहकार्याने एसटी महामंडळामार्फत सुरू करण्यात येत आहे. भविष्यात एसटी महामंडळाला उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करणे व प्रवाशांना एक विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देणे या उद्देशाने शासकीय ॲप एसटी महामंडळ चालवणार आहे. या ॲपद्वारे राज्यातील मराठी तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
छावा ॲप तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यासाठी समिती नेमली असून, समितीचा अहवाल या महिन्यात प्राप्त होणार आहे. त्यानंतर साधारण मार्च किंवा एप्रिल महिन्यात निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल. सध्या ओला, उबर, रॅपिडो यासारख्या ॲप आधारित टॅक्सी सेवा आहेत. सध्या या कंपन्यांची मक्तेदारी आहे. भविष्यात मुंबईसह राज्यात भारत टॅक्सी सुरू झाली आणि छावा ॲप सुरू झाल्यास प्रवाशांना फायदा होईल. तसेच सध्या कार्यरत कंपन्यांची मक्तेदारी मोडीत काढली जाईल. यातून प्रवाशांचा फायदा होईल.
– प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री




