Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फडणवीस यांचे विश्वासू असणाऱ्या ‘या’ नेत्याने घेतली राजकारणातून निवृत्ती

Retirement : भारतीय जनता पार्टीचे (भाजप) ज्येष्ठ नेते, विधान परिषदेचे सध्याचे आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून पूर्ण निवृत्त होण्याचा मोठा आणि अत्यंत भावनिक निर्णय जाहीर केला आहे.

काय लिहिले पत्रामध्ये?

त्यांनी आपल्या निवृत्तीचे हे पत्र खूप विचारपूर्वक लिहिले असून, त्यात सध्याच्या राजकीय वातावरणाबद्दल खोल खंत व्यक्त केली आहे. संदीप जोशी म्हणतात की, राजकारण हे त्यांच्यासाठी कधीही फक्त पद, सत्ता किंवा प्रतिष्ठेचे साधन नव्हते. ते नेहमी समाजसेवा आणि निष्ठेची वाट मानले गेले. पण आज ज्या प्रकारे सत्तेसाठी पक्षांतर होत आहेत, संधीसाधूपणा वाढला आहे आणि स्पर्धा इतकी तीव्र झाली आहे की, निष्ठावान कार्यकर्ते आणि सामान्य मतदारही अस्वस्थ झाले आहेत. मर्यादित जागा आणि प्रत्येकाच्या वाढलेल्या अपेक्षांमुळे कोणीही मागे हटायला तयार नाही, ही आजची कटू वास्तविकता आहे, असे ते सांगतात.

आज ५५ वर्षांचे झालेल्या संदीप जोशी यांनी स्वतःला अजूनही फक्त “भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता” मानताना सांगितले की, हे सगळे पाहता आता स्वतःच थांबणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय क्षणिक भावनेतून नव्हे, तर खूप सखोल विचार करून घेतलेला आहे.

त्यांच्या विधान परिषद सदस्यत्वाची मुदत १३ मे २०२६ रोजी संपत आहे. ती मुदत पूर्ण करण्याची जबाबदारी पक्षाने दिलेली आहे म्हणून ती पूर्ण निष्ठेने पार पाडीन. आमदार म्हणून त्यांच्यावर असलेली सर्व घटनात्मक, नैतिक आणि सार्वजनिक जबाबदाऱ्या ते पूर्णपणे बजावतील. पण १३ मे नंतर ते पक्षाकडून आमदारकीसाठी उमेदवारी मागणार नाहीत आणि जर पक्षाने दिली तरीही ते नम्रपणे नकार देतील. ती जागा एखाद्या सामान्य, तरुण कार्यकर्त्याला किंवा पक्ष ज्याला योग्य समजेल त्या व्यक्तीला द्यावी, अशी त्यांची इच्छा आहे.

हेही वाचा –  मुंबईत बिहार भवन उभारण्याचा निर्णय; मराठी अस्मितेच्या चर्चेत नवा राजकीय मुद्दा

या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबीयांना, जवळच्या मित्रांना, स्नेहीजनांना आणि पक्षातील कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसणार आहे, याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. तरीही ते मनापासून या सर्वांची माफी मागतात आणि अत्यंत नम्रपणे हा निर्णय जाहीर करतात.

संदीप जोशी यांनी पक्ष आणि नेतृत्वाचे विशेष आभार मानले आहेत. कुटुंबानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्यावर संस्कार केले, त्यांना घडवले. त्यानंतर भाजपने या सामान्य कार्यकर्त्याला चार वेळा नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर आणि विधान परिषद सदस्य अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देऊन सन्मानित केले. या सर्व संधींबद्दल ते कायम ऋणी राहतील, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणतात, “राजकारणात राहिलो तर पुढेही संधी मिळतील, याची मला पूर्ण खात्री आहे. कारण एक सामान्य कार्यकर्ता देशाचा पंतप्रधान बनू शकतो, हे फक्त आणि फक्त भाजपमध्ये शक्य आहे, हे मी अभिमानाने सांगतो. पण माझ्या असण्यामुळे कुठल्याही सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये, हे माझे प्रामाणिक मत आहे. आणि नसण्यामुळे कोणाचेही काही अडणार नाही, हे अंतिम सत्य आहे.”

१३ मे नंतर ते पूर्णपणे सक्रिय राजकारणातून बाहेर पडतील आणि फक्त सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ता म्हणून आयुष्य जगतील. तरीही त्यांचे सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील कार्य मात्र अविरत सुरू राहील. कोरोनाकाळातील ‘सोबत पालकत्व प्रकल्प’, ‘दीनदयाल थाळी प्रकल्प’, गोसेवा प्रकल्प, गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना, बास्केटबॉल, ॲम्युचर हॉकी, कुस्ती, बॉडी बिल्डिंग संघटना आणि खासदार क्रीडा महोत्सव अशा अनेक प्रकल्पांमधून ते तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देत राहतील.

शेवटी त्यांनी आपल्या पत्रात खूप सुंदर शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत:

_कुर्सी नहीं, क़ीमत बचाने चला हूँ,_

_शोर नहीं, सुकून चुनने चला हूँ।_

_किसी और की राह रोशन हो सके,_

_इसलिए ख़ुद एक क़दम पीछे हटा हूँ।_

आता मी थांबतोय…!

संदीप जोशी यांची ही निवृत्ती फक्त एक राजकीय निर्णय नाही, तर निष्ठा, समाजसेवा आणि तरुण पिढीला संधी देण्याच्या त्यांच्या ठाम विश्वासाची साक्ष आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button