उन्हाळी पावसामुळे राज्यात ५१ हजार हेक्टरवर नुकसान..जाणून घ्या सर्वाधिक नुकसान कोणत्या जिल्ह्यात?

मुंबई : राज्यात गत चार दिवसांत झालेल्या उन्हाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. १६ ते १९ मार्च दरम्यान राज्यातील विविध २४ जिल्ह्यांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
प्राथमिक आकडेवारीनुसार, सर्वाधिक फटका अहिल्यानगर, नाशिक, सांगली या जिल्ह्यांना बसला आहे. अहिल्यानगरमध्ये ११,६५०.१४ हेक्टर, छत्रपती संभाजीनगरमध्ये ८,४४५.१० हेक्टर, नाशिकमध्ये ७,३०१.९० हेक्टर, सांगलीत १,८६५.४२ हेक्टर, जालन्यात १,६९२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. धुळे जिल्ह्यात ६,६८५.९० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातही ३,८०२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
सोसाट्याचा वारा, पाऊस आणि गारपिटीत रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदा, भाजीपाला या पिकांसह द्राक्ष, डाळिंब, आंबा, केळी, मोसंबी, पपई या फळपिकांनाही मोठा फटका बसला आहे. विशेषतः द्राक्षबागा आणि भाजीपाला पिकांचे गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव, जत, आटपाडी भागातही द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये हरभरा, ज्वारी आणि गहू पिकाला फटका बसला आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्येही गहू, ज्वारी आणि मका पिकांचे नुकसान झाले आहे. काही भागांत वाऱ्यासह पावसामुळे पिके आडवी पडल्याने नुकसान वाढले आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर अखेर रूपाली चाकणकर यांचा राजीनामा
दरम्यान, हा प्राथमिक अहवाल असून, काही जिल्ह्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे नुकसानाचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासनाकडून पंचनामे सुरू आहेत. या नैसर्गिक संकटामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. शेतकरी संघटनांनी तात्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
राज्यभरात उन्हाळी पाऊस, सोसाट्याचा वारा आणि गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार खंबीरपणे उभे आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत दिली जाईल, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
सर्वाधिक नुकसानग्रस्त जिल्हे
एकूण २४ जिल्ह्यांत नुकसान झाले आहे. त्यापैकी आहिल्यानगर, नाशिक, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, सांगली या जिल्ह्यांत मोठे नुकसान झाले आहे.
या पिकांचे झाले नुकसान
रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, मका, द्राक्ष, डाळिंब, आंबा, पपई, मोसंबी, केळी, काकडी, कलिंगड आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.





