Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रतिबंधित पान मसाला, गुटखा, भेसळयुक्त अन्नपदार्थाचा १ कोटी ५८ लाख २८ हजार रुपयांचा साठा जप्त

अन्न पदार्थांच्या दर्जाबाबत तक्रार नोंदणीसाठी टोल-फ्री क्रमांक जाहीर

अन्न व औषध प्रशासनाच्या राज्यव्यापी मोहीम; सात दिवसात 102 व्यक्ती अटकेत

मुंबई | राज्यातील प्रतिबंधित पान मसाला,गुटखा, भेसळ अन्नपदार्थाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर सात दिवस धडक मोहीम राबवत २५ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत एकूण १ कोटी ५८ लाख २८ हजार ६७७ रुपयांचा साठा जप्त केला असून १०२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. एकूण २०३ आस्थापनांवर कारवाई केली. तसेच ८६ आस्थापना सील करण्यात आल्या आहेत.

प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्याविरोधात कारवाई..

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभर प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तत्सम पदार्थांच्या उत्पादन, साठवणूक व विक्रीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत १३० आस्थापनांवर छापे टाकण्यात आले.

  • कोकण विभाग – ४७ कारवाया, ४६ व्यक्तींना अटक
  • बृहन्मुंबई – २२ कारवाया, २३ व्यक्तींना अटक
  • पुणे विभाग – १४ कारवाया, १३ व्यक्तींना अटक
  • नाशिक विभाग – ५ कारवाया, ५ व्यक्तींना अटक
  • छत्रपती संभाजीनगर विभाग – ८ कारवाया, ८ व्यक्तींना अटक
  • अमरावती विभाग – ५ कारवाया, ५ व्यक्तींना अटक
  • नागपूर विभाग – २ कारवाया, २ व्यक्तींना अटक

यामध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या कलम २६, २७, ३०(२)(अ) आणि ५९ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत ३४ लाख ५ हजार ४८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हेही वाचा

अवैध गॅस रिफिलिंग व्यवसायावर पोलिसांचा छापा, ८१ गॅस सिलिंडर जप्त

भेसळयुक्त व निकृष्ट अन्नपदार्थांवरही कारवाई..

अन्न व औषध प्रशासनाच्या ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ या संकल्पनेअंतर्गत राज्यभर भेसळ, अस्वच्छ अन्न उत्पादक आणि नियमभंग करणाऱ्या अन्न व्यवसायिकांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. मुंबई, नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, भंडारा, जालना, बीड, नांदेड, परभणी, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, जळगाव, रायगड, धुळे आदी जिल्ह्यांमध्ये अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तपासण्या केल्या.

या मोहिमेत ७३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आंबे, बुंदी लाडू, खवा, बेकरी पदार्थ, कँडी, दूध व दुग्धजन्य पदार्थ, गूळ, खाद्यतेल, तूप, खजूर, आईस्क्रीम, कुल्फी, फ्रोजन डेझर्ट, मसाले, शेंगदाणा चिक्की तसेच भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचा समावेश होता. या कारवाईत १ कोटी २४ लाख २३ हजार ६२९ रुपये किमतीचा आणि सुमारे ९०,६३९ किलो वजनाचा संशयित निकृष्ट व असुरक्षित अन्नसाठा जप्त करण्यात आला. संबंधित अन्न नमुने पुढील विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

तक्रारीं देण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन.

नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. भेसळ, निकृष्ट दर्जाचे अन्न किंवा प्रतिबंधित पदार्थांचे उत्पादन व विक्री आढळल्यास यापुढे आणखी कठोर कारवाई करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत शंका असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा. यासाठी स्वतंत्र तक्रार नोंदणी अॅप विकसित करण्यात आले आहे.

टोल फ्री क्रमांक : १८००२२२३६५

ई-मेल : [email protected]

तक्रार करताना नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, संबंधित आस्थापनेचा अचूक पत्ता आणि कोणत्या अन्नपदार्थात भेसळ होत असल्याची माहिती नमूद करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button