‘हिंदू समाज जगातील महामूर्ख जमात’; संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य

Sambhaji Bhide | शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे हे सतत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मूर्ख लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्तान, असं वक्तव्य भिडेंनी केलंय. सत्ताकारण आणि अर्थकारण शूद्र आहेत. ते थुंकण्याच्या लायकीचे विषय असल्याचं भिडे म्हणालेत. नवरात्रोत्सावानिमित्ताने सांगलीत श्री शिवप्रतिष्ठानच्यावतीने दुर्गामाता दौडीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी धारकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे विधान केलं आहे.
संभाजी भिडे म्हणाले, की शिवाजी महाराजांनी हिंदू समाजाला जगाचे नेतृत्व करण्याचा मार्ग शिकवला. पण सध्या हा धर्म निद्रिस्त झाला आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाचे ‘इव्हेंट’ झाले असून यातील प्रकार हिंदू समाजाला नामर्द बनवत चालला आहे. हिंदू-मुस्लिम भाई भाई, हिंदूंना शत्रू कोण, मित्र कोण; वाईट कोण, चांगलं कोण हे कळत नाही. हिंदूंना शत्रू कोण आणि मित्र कोण हे कळत नाही. जगातील महामूर्ख जमात म्हणजे हिंदू. यातून बाहेर पडायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा भारत करण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत.
हेही वाचा – चिखली घरकुल समस्या सोडवण्यासाठी ‘फास्ट ट्रॅक’वर उपाययोजना!
राजकारण, सत्ताकारण,अर्थकारण शूद्र आहे. हे थुंकण्याच्या लायकीचे विषय आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या रक्ताचा समाज निर्माण करण्याची गरज आहे असं विधान देखील संभाजी भिडे यांनी केलं आहे. दुर्गामाता दौडीमध्ये असणाऱ्या पोलिसांनी देखील टोप्या घालून आपल्या सोबत दौडीत पळालं पाहिजे, असंही संभाजी भिडे म्हणाले.





