Maharashtra Weather | राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Maharashtra Weather Update | राज्यात काही भागात पावसाने उघडीप दिली आहे. तर, कोकण, घाटमाथ्यावर आणि विदर्भात पाऊस कोसळत आहे. दरम्यान, कोकणासह घाटमाथ्यावर आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे रत्नागिरी, पुणे, सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण, घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज रत्नागिरीबरोबरच पुणे आणि सातारा घाट परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट परिसर, नांदेड, नागपूर, भंडारा गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली , जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारी, २९ जून रोजी संपूर्ण देश व्यापला. साधारणपणे 8 जुलै रोजी मोसमी वारे संपूर्ण देश व्यापतात. यंदा नऊ दिवस आधीच मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण देश व्यापला आहे.
हेही वाचा : महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाने जागतिक स्तरावर ओळख निर्माण करावी; सरन्यायाधीश भूषण गवई
मुंबई, ठाणे, पालघर, संपूर्ण विदर्भ, रायगड, पुणे, उत्तर महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता असून काही भागात मध्यम ते मुसळधार सरी बरसतील. आकाश ढगाळ राहणार असून आर्द्रता वाढलेली असेल. तापमान २५ अंश सेल्सिअस ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत राहील. नागरिकांनी व शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच दिवसाचे नियोजन करावे. सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असल्याने विशेष काळजी घ्या.





